पंढरपूर(प्रतिनिधी):-राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमुठ ढीली झाल्याची टीका करत, जयंत पाटील यांनी जे काल वक्तव्य केले आहे त्यावरून ते ही राष्ट्रवादी सोडून जातील असे वाटते, असं अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार सुजय विखे पाटलांनी म्हटलं आहे.
सुजय विखे आज पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले. शरद पवार यांचा राजीनामा ही पक्षांतर्गत बाब आहे. जशी समुद्राची वाळू मुठीत घट्ट पकडल्यानंतर ती तितक्याच्या वेगाने ढीली होते. त्या प्रमाणे महाविकास आघाडी वज्र मुठ आहे, अशी टीका खासदार सुजय विखे पाटील यांनी यावेळी केली.



