लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ‘खोडा’ घालून लाडक्या बहीणींचा घास हिरावून घेण्याचे पाप महाविकास आघाडीचे नेते करीत असल्याचा आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. निवडणूक आयोगाने दोन महीने योजना बंद ठेवण्याचे आदेश दिले असले तरी, नोव्हेंबर महीन्याचा हप्ता यापुर्वीच जमा झाला आहे. डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यातच लाडक्या बहीणींना मिळणार आहे.योजेनला मिळालेल्या प्रतिसादामुळेच महाविकास आघाडी कडून योजनेबाबत केवळ दिशाभूल करण्याचे काम सुरु असल्याची टिका त्यांनी केली.
शिर्डी येथे माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, महायुती सरकारने सुरु केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलीच धडकी भरली आहे. त्यामुळेच या योजनेमध्ये अडथळे आणण्याचे पाप त्यांच्याकडून सातत्याने सुरु आहे. योजना बंद पडावी म्हणून यापुर्वी आघाडीचे नेते न्यायालयात गेले. परंतू तिथेही त्यांना यश आले नाही. सत्तेत आल्यावर ही योजनाच बंद करण्याची भाषा त्यांच्याकडून सुरु झाली. आता तर निवडणूक आयोगाकडे जावून तक्रार केल्यामुळेच लाडक्या बहीणींना एक महीन्याकरीता योजनेतील रक्कमेपासून वंचित राहावे लागणार असले तरी, नोव्हेंबर महीन्याचा हप्ता महायुती सरकारने बहीणींच्या खात्यात जमा केला असल्याचे ना.विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
महायुती सरकारने जुलै २०२४ पासून सुरु केलेल्या योजनेतून पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे पैसे जमा केले आहेत. ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचा लाभ आचारसंहिता लागण्या पुर्वीच राज्यातील २ कोटी ३४ लाख पात्र बहीणींच्या खात्यात जमा झाले असल्याकडे लक्ष वेधले.योजनेबाबत दिशाभूल करण्याचे काम महाविकास आघाडीकडून सुरु असून, आघाडीच्या नेत्यांकडून योजनेमध्ये सातत्याने आणण्यात येणा-या अडथळ्यांमुळेच बहीणींना मिळणा-या आर्थिक स्वातंत्र्यापासून वंचित ठेवण्याचे पाप महाविकास आघाडी कडून केले जात आहे.याचे प्रायश्चित लाडक्या बहीणी आघाडीच्या नेत्यांना देतील आणि त्यांना दारातही उभे करणार नाहीत असा इशाराच मंत्री विखे पाटील यांनी दिला.
महायुतीच्या उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार असल्याचे स्पष्ट करून संगमनेरच्या उमेदवारी बाबत लवकरच घोषणा होईल, उमेदवार कोणी असला तरी संगमनेरात परीवर्तन होणारच आहे. संगमनेर मध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार तरी अद्याप कुठे फायनल आहे असा उपरोधिक सवाल त्यांनी उपस्थित केला.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांनी शिर्डी विधानसभा मतदार संघात वाढीव मतदार नोंदणी बाबत केलेल्या विधानावर भाष्य करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, निवडणूक आयोगानेच नविन मतदार नोंदणीची मुदत १९ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठेवली होती. त्यामुळेच आयोगाच्या निर्देशाबाहेर जावून काही केलेले नाही. आघाडीमध्ये होत असलेली बिघाडी आणि योजनांच्या माध्यमातून महायुतीला मिळत असलेला जनाधार यामुळेच अशी विधानं वैफल्यग्रस्तेतून केली जात असल्याची प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.



