spot_img
spot_img

सहकारी चळवळीची ठेवलेली बांधिलकी आणि सभासदांनी दाखविलेल्‍या विश्‍वासामुळेच पद्मश्री डॉ.विखे पाटील कारखान्‍याची ७५ वर्षांची वाटचाल यशस्‍वी- ना. राधाकृष्ण विखे पाटील

लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):- सहकारी चळवळीची ठेवलेली बांधिलकी आणि सभासदांनी दाखविलेल्‍या विश्‍वासामुळेच पद्मश्री डॉ.विखे पाटील कारखान्‍याची ७५ वर्षांची वाटचाल यशस्‍वी होवू शकली. भविष्‍यात कारखान्‍याचे आधुनिकीकरण करण्‍याबरोबरच, गाळप क्षमता वाढविण्‍याचा प्रयत्‍न असून, सभासदांना भावा देण्‍यातही आपला कारखाना प्रथम क्रमांकावर राहील अशी ग्‍वाही जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याचा अमृत महोत्‍सवी गळीत हंगाम सांगता समारंभ माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झाला. या कार्यक्रमास जेष्‍ठनेते आण्‍णासाहेब भोसले, चेअरमन कैलास तांबे, कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्‍वर गोंदकर, व्‍हा.चेअरमन सतिष ससाणे, प्रवरा बॅकेचे चेअरमन डॉ.भास्‍करराव खर्डे, व्हा.चेअरमन मच्छिंद्र थेटे, ट्रक्‍स वाहतूक सोसायटीचे चेअरमन नंदु राठी, व्‍हा.चेअरमन सुनिल जाधव, चेअरम गिताताई थेटे, कांचन मांढरे, रोहीणी निघुते, कार्यकारी संचालक महेश कोनापुरे यांच्‍यासह सर्व संस्‍थांचे संचालक आणि सभासद उपस्थित होते.

या कार्यक्रमात शेतकरी विकास मंडळाचे चंद्रकांत नारायण डुक्रे आणि मित्र परिवाराने कारखान्‍याच्‍या अमृत महोत्‍सवा निमित्‍त ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांचा विशेष सत्‍कार केला.

आपल्‍या भाषणात मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, ७५ वर्षांपुर्वी पद्मश्रींनी या साखर कारखान्‍याचे रोपटे लावले आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. एकीकडे अंतरराष्‍ट्रीय सहकार वर्ष साजरे होत असताना कारखान्‍याची ७५ वर्षांची वाटचाल पुर्ण होणे ही सहकार चळवळीसाठी मोठी अभिमानाची बाब आहे. अनेक चढ उतार पाहुनही ही साखर कारखानदारी शेतक-यांच्‍या मालकीची राहीली, हे या यशस्‍वी वाटचालीचे महत्‍व असून, शेतकरी, सभासदांच्‍या हितासाठी घेतलेल्‍या निर्णयांमुळेच ७५ वर्ष हा कारखाना अविरतपणे सुरु राहीला.

राज्‍यातील सहकार चळवळीपुढे अनेक प्रश्‍न निर्माण झाले पण ते सोडविण्‍यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही. जाणते राजे सुध्‍दा दिल्‍लीत फक्‍त शिष्‍टमंडळ घेवून जात होते. सहकारी संस्‍थाचे प्रश्‍न न सुटल्‍यामुळेच अनेक सहकारी संस्‍था बंद पडल्‍या. सहकारी कारखान्‍यांचे खासगीकरण झाले. कवडीमोल भावाने कारखाने विकले गेले. केवळ सहकारातील संस्‍थाना दडपून टाकायचे, एक प्रकारची दहशत निर्माण करायची. राजकीय सोयीसाठी या संस्‍थाना वापर झाला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली सहकार मंत्रालय स्‍थापन झाल्‍यानंतर सहकार चळवळीला मोठी बळकटी मिळाली असल्‍याचे मंत्री विखे पाटील यांनी आवर्जुन सांगितले.

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्‍या पुढाकाराने सहकारी साखर कारखानदारीला मोठे पाठबळ मिळत असून, कारखान्‍यांवरील आयकराचा बोजा त्‍यांच्‍या एका धाडसी निर्णयामुळे कायमस्‍वरुपी निकाली निघाला. साखर कारखानदारीला आधार देवून शेतक-यांचे हित पाहणारी धोरण केंद्र सरकार घेत असून, इथेनॉल आणि साखरेच्‍या दराबाबतीत केंद्र सरकारने निर्णय केल्‍यामुळेच सहकारी साखर कारखानदारीला स्‍थैर्य मिळाल्‍याचे ना.विखे पाटील यांनी स्‍पष्‍ट केले.

आज राज्‍यातील बोटावर मोजण्‍या इतक्‍या जिल्‍हा सहकारी बॅका चांगल्‍या पध्‍दतीने सुरु आहेत.अहिल्‍यानगर जिल्‍हा बॅकेंनेही चांगले काम करुन, साखर कारखानदारीला आधार देण्‍याचे काम केल्‍यामुळेच जिल्‍ह्यातीही सहकारी साखर कारखाने तग धरु शकले. यंदाचा गाळप हंगाम आव्‍हानात्‍मक होता. डॉ.विखे पाटील कारखान्‍याच्‍या संचालक मंडळाने योग्‍य नियोजन करुन, गाळप हंगाम यशस्‍वी केला याबद्दल अभिनंदन करुन, मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, भविष्‍यात यावर आता येथेच थांबून चालणार नाही. आपल्‍याला कारखान्‍याचे आधुनिकीकरण करुन, गाळप क्षमता वाढवायची आहे. कार्यक्षेत्रात ऊसाचे उत्‍पादन अधिक निर्माण करावे लागेल. पाण्‍याचे योग्‍य नियोजन असल्‍यामुळे पाण्‍याची समस्‍या भेडसावणार नाही. पाण्‍याचे आवर्तन योग्‍य पध्‍दतीने झाल्‍यामुळेच बंधारे आज भरलेले आहेत. येत्‍या ७ तारखेपासून भंडारदरा धरणातून आवर्तन सुरु करण्‍यात येणार असल्‍याची माहीती त्‍यांनी दिली. आणखी दोन आवर्तनांचे नियोजन असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांनी आपल्‍या भाषणात सहकारी साखर कारखानदारीच्‍या वाटचालीचा आढावा घेवून सांगितले की, पद्मश्रींनी रुजविलेला सहकाराचा विचार खासदार साहेबांनी यशस्‍वीरित्‍या पुढे नेला. आज तिसरी पुढी यात काम करीत आहे. सहकारी चळवळीचे खासगीकरण होवू नये म्‍हणून खासदार साहेबांना संघर्ष करावा लागला. यामध्‍ये त्‍यांचा स्‍वार्थ नव्‍हता. सहकार चळवळीतून या भागात सामाजिक आधारही सर्वांना मिळाला. एका विचाराने काम होवू शकले.

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी त्रिभूवन सहकार विद्यापीठ स्‍थापन करण्‍याचा एैतिहासिक निर्णय घेतला. या विद्यापीठामुळे सहकारी संस्‍थांमध्‍ये संशोधन, प्रशिक्षण आणि तांत्रिक विकासाचे योग्‍य मार्गदर्शन मिळेल. यामुळे सहकारी संस्‍थाच्‍या बळकटीकरणासाठी मोठी मदत होईल. या सहकार विद्यापीठाचे केंद्र महाराष्‍ट्रात व्‍हावे अशी अपेक्षा मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली.

वसंतदादा शुगर इस्टिट्युटने आता खासगी संस्‍थानाही सभासदत्‍व देण्‍यास प्रारंभ केल्‍याने ही संस्‍था आता राजकीय अड्डा बनत चालली आहे. या संस्‍थेने सहकारी संस्‍थांच्‍या बळकटीकरणासाठी धोरण घ्‍यायला पाहीजे होते परंतू तसे झाले नसल्‍याची टिका मंत्री विखे पाटील यांनी आपल्‍या भाषणात केली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!