राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा) :–राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपुर रोड लगत असलेल्या दत्त लॉन्स येथे आज रविवारी विवाह समारंभात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. लग्नात झालेले हाणामारीमुळे तालुक्यात चर्चेचा विषय ठरला.
वरपक्ष आणि वधू पक्षातील तरुणांत किरकोळ कारणातून जोरदार हाणामारी झाली. या कारणाने वर पक्षातील चार ते पाच तरुण जखमी झाल्यामुळे त्यांना लग्न मंडपातून थेट रूग्णालयात न्याव लागलं आहे.
राहुरी फॅक्टरी येथे एक लग्न समारंभ होता. या लग्नाला पारगावाहून वऱ्हाडी आले होते.या लग्नाची मुलीकडच्या मंडळींकडून जोरदार तयारी सुरू होती. ठरल्याप्रमाणे रविवारी लग्न सोहळा पार पडला.मात्र यावेळी वधू पक्षातील तरुण आणि वर पक्षातील मद्यधुंद तरुण यात वाद झाला.सुरूवातीला हा वाद किरकोळ होता.पण नंतर या वादाचं रूपांतर राड्यात झालं.
लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र वरपक्षातील वऱ्हाडातील तरुणांनी आक्रमक भूमिका घेतली.त्यामुळे हा वाद चिघळला.हा वाद इतका वाढला की लग्न मंडपाला चक्क युद्धाच्या छावणीचं रूप आलं. कारण शाब्दिक बाचाबाची थेट हाणामारी होईपर्यंत पुढे गेली.अन् वर पक्षातील काही मद्यधुंद तरुणांना लग्न मंडपातून थेट रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.