शिर्डी(जनता आवाज वृत्तसेवा):-संपूर्ण जगाला श्रध्दा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या भूमीत पुण्यश्लोक अहील्यादेवीचा जयजयकार करीत श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून निघालेल्या दोन्ही यात्रा शिर्डीत दाखल झाल्या.महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा केलेला संकल्प जलयात्रेच्या निमिताने पूर्ण करण्याचा निर्धार जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून गोदा ते नमर्दा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे गोदा नदीचे उगमस्थान असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे जन्मस्थळ असलेल्या चोंडी येथून यात्रेची सुरूवात करण्यात आली.दोन्ही यात्रा शिर्डी मध्ये एकत्रित होवून मध्यप्रदेशकडे सोमवारी रवाना होणार आहेत.राज्यातील सर्व नद्यामधून आलेल्या जलकलशाचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
शिर्डीमध्ये जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील खा.वडतुके आ.गोपीचंद पडळकर आ.सदाभाऊ खोत यांच्यासह शिर्डीकर ग्रामस्थांनी शहरातील मल्हारी मार्तंड मंदीरात पूजन करून यात्रेचे स्वागत केले.शहरातील प्रमुख मार्गावरून जलकलशाची शोभायात्रा काढून जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापनाचा संदेश चित्रफितीतून देण्यात आला.
पूण्यश्लोक अहील्यादेवींचा पुतळा आणि कलशाचा रथ जलयात्रेचे मुख्य आकर्षण आहे.धनगर नृत्य तसेच मंत्री विखे पाटील यांच्यासह सर्व सहभागी आमदारांचा बस मधून चाललेला प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे.
यात्रेच्या निमिताने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक सोहळ्यात बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जलसंवर्धनाची चळवळ महत्वपूर्ण होतीच पण सांस्कृतिक परंपरेचा वारसा सुध्दा त्यांच्याकडून आपल्याला मिळाला.श्री दासगणू महराजांनी श्री साईबाबा सुवर्ण मंजिरी ग्रंथ महेश्वर येथे लिहीला त्यामुळे शिर्डी आणि महेश्वर नगरीच नात हे अध्यात्माने जोडले गेले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.



