कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा) :- महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मराठी भाषा, साहित्य आणि कवितेचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी भाषा समितीचे अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालय येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेली बहारदार काव्य मैफल शनिवार (०२) रोजी उत्साह, रंगत आणि काव्यमय वातावरणात असंख्य रसिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली.
या काव्य मैफिलीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य मराठी भाषा समितीचे सदस्य आमदार संजय केणेकर यांच्या हस्ते व भाषा समितीचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे व सदस्य आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे प्रास्तविक साहित्यिक राजेंद्र कोयटे यांनी केले. वैशाखाच्या तळपत्या उन्हालाही हरवणारा कवितेचा गारवा अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावलेल्या कोपरगावच्या साहित्य रसिकांना कवितांनी अक्षरश: मंत्रमुग्ध केले. वैशाखाच्या तळपत्या उन्हातही कवितेच्या गारव्याने भारलेली एक अविस्मरणीय काव्य मैफल शनिवारी कोपरगाव शहरात रंगली. येथील कृष्णाई मंगल कार्यालय मध्ये पार पडलेल्या या बहारदार कार्यक्रमाने काव्यरसिकांच्या मनावर अक्षरशः मोहिनी घातली होती. प्रत्येक कवितेच्या ओळीला मिळणारा टाळ्यांचा प्रतिसाद आणि उडणारे हास्याचे फवारे वैशाख वणव्याच्या लाहीत जशी एखादी थंडगार झुळूक मनाला सुखावून जावी तशीच अनुभूती या काव्य मैफलीने कोपरगावच्या असंख्य साहित्य रसिकांना अनुभवयास मिळाली.
या काव्य मैफलीत कवी आबेद शेख, आबासाहेब पाटील, गुंजन पाटील, नितीन चंदनशिवे, रमजान मुल्ला, लता एवळे, संदीप काळे, शशिकांत शिंदे, तालिब सोलापुरी अशा नामवंत कवींच्या कवितांनी व तेवढ्याच उच्च दर्जाच्या इंद्रजीत घुले यांच्या काव्यमय सूत्रसंवादाने मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या दर्दी रसिकांना कवितेच्या शब्दात देहभान विसरण्यास भाग पाडले. या कवींच्या ओजस्वी, भावस्पर्शी प्रेम, सामाजिक वास्तव, निसर्ग, विनोद आणि जीवनातील सूक्ष्म भावछटा अशा अनेक रंगांनी ही काव्य मैफल उतरोत्तर अधिकच रंगत गेली. प्रत्येक काव्य पंक्तीवर रसिकांकडून टाळ्यांचा कडकडाट होत होता, तर काही कवितांनी सभागृहात क्षणभर शांततेचे गूढ वातावरण निर्माण करत अंतर्मुख देखील केले होते. तर काही ठिकाणी शांततेतून उमटणारी दादही तितकीच बोलकी ठरत होती.नामवंत कवींच्या सशक्त सादरीकरणासह रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण कृष्णाई कार्यालय काव्यमय झाल्याचे चित्र याप्रसंगी पाहायला मिळाले.
यावेळी बोलतांना महाराष्ट्र राज्य मराठी भाषा समितीचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे म्हणाले की, महाराष्ट्र दिन हा केवळ उत्सव नसून आपल्या मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा अभिमान व्यक्त करण्याचा दिवस आहे. महाराष्ट्र राज्य मराठी भाषा समितीचे अध्यक्ष या नात्याने मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करणे हि माझी प्राथमिक जबाबदारी आहे. कविता आणि साहित्य हे समाजाचे जिवंत प्रतिबिंब आहे. बदलत्या काळातही साहित्याची ही परंपरा जपणे अत्यंत गरजेचे असून मराठी भाषेची समृद्धी टिकवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे. कोपरगावसारख्या शहरात अशा काव्य मैफलींचे आयोजन करून साहित्याची गोडी नव्या पिढीत रुजवण्याचा प्रयत्न असून नवोदित कवींना व्यासपीठ मिळावे, तसेच रसिकांमध्ये वाचन आणि लेखनाची आवड निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे. या बहारदार काव्य मैफलीच्या माध्यमातून कोपरगावच्या सांस्कृतिक जीवनात एक नवा रंग भरला आहे. या काव्य मैफिलीच्या कार्यक्रमाने कोपरगावच्या सांस्कृतिक विश्वाला एक नवा आयाम मिळाला असून कोपरगावच्या सांस्कृतिक इतिहासाला नवे पान जोडले गेले आहे. रसिकांच्या मनात या कार्यक्रमाची गोड आठवण दीर्घकाळ दरवळत राहणार असून काव्य मैफिलीला मिळालेला उस्त्फुर्त प्रतिसाद पाहता यापुढील काळातही मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अशाच प्रकारच्या कार्यक्रमांचे आवर्जून आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
काव्य संमेलनाचे उद्घाटक आमदार संजय केणेकर म्हणाले की, जय जय महाराष्ट्र माझा गीतातून प्रेरणा आणि चेतना मिळते. मराठी भाषा मोहक आणि सुंदर आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य मराठी भाषा समितीला आमदार आशुतोष काळे यांच्या रूपाने मिळालेले अध्यक्ष देखील मोहक आणि सुंदर असून या पदाला साजेसं व्यक्तिमत्व आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. मराठी भाषेला आपण माय म्हणतो आणि माय म्हटलं की, त्यापुढे आभाळ आणि समुद्रपण कमी पडतो. त्यामुळे माय, माती आणि मातृभाषा यांची नाळ कधीच तुटू देवू नका आणि मनातील विचारांचं प्रदूषण हटवायचं असेल तर कवितेशी समरस व्हा असा बहुमोल सल्ला दिला.
महाराष्ट्र राज्य मराठी भाषा समितीचे सदस्य आमदार प्रा.रमेश बोरनारे म्हणाले की, मी आजवर अनेक कवी सम्मेलन पाहिले आहे त्या कवी संमेलनाला गर्दी पण पाहिली परंतु हे पहिलेच कवी सम्मेलन मी पाहतो आहे ज्याठिकाणी गर्दी पण आहे आणि दर्दी पण आहेत अशा शब्दात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या साहित्य रसिकांच्या उपस्थितीला दाद दिली.आमदार आशुतोष काळे आणि मी एकाच वेळी आमदार झालो आणि आमच्या दोघांची हि दुसरी टर्म असून मागील साडे सहा वर्षात त्यांनी अतिशय चांगले काम केले आहे.ज्याप्रमाणे कोपरगावचे पत्रकार साहित्यिक लिहितात त्यावर लक्ष केंद्रित करून आमदार आशुतोष काळे मतदार संघातील विकास कामे करतात मी पण त्याच्याप्रमाणेच काम करतो. परंतु मी त्यांना अधूनमधून विचारत असतो की,विकासकामांसाठी निधी कसा आणि कोणत्या योजनेतून मिळविला असे सांगत आमदार आशुतोष काळेंच्या निधी मिळविण्याचे कौतुक केले. यावेळी कोपरगाव मतदार संघातील साहित्य क्षेत्रातील कवी, लेखक,पत्रकार, साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार आशुतोष काळे माय मराठी समृद्ध करण्याचे नैतिक कर्तव्य———-
महायुती शासनाचा प्रतिनिधी म्हणून आमदार आशुतोष काळे यांची महाराष्ट्र राज्य मराठी भाषा समितीच्या अध्यक्षपदी झालेली निवड मोठी जबाबदारी आहे. आपल्या वाट्याला आलेल्या कर्तव्याचे भान ठेवून त्याची प्रामाणिकपणे पूर्तता करणे, हेच खऱ्या नेतृत्वाचे लक्षण असते आणि तेच त्यांच्या कार्यातून प्रकर्षाने दिसून येते. माय मराठीच्या समृद्धीसाठी त्यांनी स्वीकारलेली ही धुरा सांस्कृतिक बांधिलकीची आहे. काव्य मैफिलीच्या सुरेल आणि संवेदनशील माध्यमातून त्यांनी कवितेचा डोलारा अधिक बहरवला, शब्दांना नवचैतन्य देवून माय मराठी समृद्ध करण्याचे नैतिक कर्तव्य पार पाडत आपल्या पदाला व जबाबदारीला खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे.असा कार्यक्रम कोपरगावमध्ये प्रथमच अनुभवायला मिळाला. इतक्या दर्जेदार कवींच्या कविता ऐकताना हि काव्य मैफल कधी संपली हे कळलंच नाही.अशा कार्यक्रमांचे आयोजन वारंवार होणे गरजेचे असून आमदार आशुतोष काळे यांनी याबाबत पुढाकार घेवून आयोजित केलेली ही काव्य मैफल वैशाखाच्या उकाड्यात मनाला दिलासा देणारी गार वाऱ्याची झुळूक होती.
-साहित्य रसिकांच्या



