कोल्हार खुर्द (जनता आवाज वृत्तसेवा):- राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील चिंचोली-कोल्हार खुर्द पिण्याच्या पाणी योजनेच्या साठवण तलावात बुडून पाटीलवाडी येथील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. अंधार पडल्यामुळे शनिवारी शोधमोहीम थांबविण्यात आली होती. मात्र रविवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशन राबवून तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे .
मृत तरुणाचे नाव कैलास रामदास ठाकरे (वय ३४, रा. पाटीलवाडी) असे आहे. शनिवारी सायंकाळी ते मित्रासोबत तळ्याकाठी गेले असता पाण्यात बुडाल्याची घटना घडली.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली. मात्र अंधारामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण झाल्याने ती रात्री थांबविण्यात आली.
रविवारी सकाळी राहुरी, श्रीरामपूर व देवळाली प्रवरा येथील प्रशासनाच्या संयुक्त पथकाने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर कैलास ठाकरे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी येथील रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे पाठविण्यात आला.
या बचाव व शोधकार्यात राहुरी नगर परिषद, देवळाली प्रवरा नगर परिषद, श्रीरामपूर नगर परिषद, ईआरटी (ERT) रेस्क्यू टीम, अहिल्यानगर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आपदा मित्र अनिल जाधव, पोलीस कर्मचारी रवी पवार, तलाठी प्रशांत शेटे तसेच जीवनदायी रुग्णवाहिकेचे निखिल भोसले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या दुर्दैवी घटनेमुळे चिंचोली, पाटीलवाडी व कोल्हार खुर्द परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



