अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):- जिल्हा परिषदेत काही कर्मचारी वेळेवर कार्यालयात येत नसल्याच्या तक्रारी आहेत. काहीजण उशिरा येत असल्याची, तर काहीजण हजेरी लावून कार्यालयातून बाहेर जात असल्याची चर्चा आहे. कार्यालयीन वेळेत वैयक्तिक कामे, खरेदी तसेच अन्य कार्यक्रमांसाठी वेळ दिला जात असल्याच्या तक्रारीही आहेत. त्यामुळे कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे.
मागील सहा महिन्यांची हजेरी तपासल्यास कोण कर्मचारी नियमित उशिरा येतात, याची माहिती समोर येऊ शकते. हजेरी रजिस्टर, बायोमेट्रिक नोंदी आणि हालचाल रजिस्टरचीही तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
जिल्हा परिषदेचे कामकाज सकाळी साडेनऊ वाजता सुरू होत असताना गेट सकाळी सात वाजताच उघडले जात असल्याची चर्चा आहे. या वेळेत येणारी वाहने कोणाची आहेत, कर्मचारी लवकर येतात की अन्य व्यक्ती वाहने पार्क करून जातात, याचीही तपासणी करण्याची मागणी आहे.
गणेशोत्सव व गौरीच्या साहित्य खरेदीसाठी काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत व्यस्त असल्याची चर्चा आहे. तसेच कार्यालयात बाहेरील व्यावसायिकांच्या बैठका कोणाच्या परवानगीने होतात, याचाही खुलासा करण्याची मागणी होत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी करून वस्तुस्थिती जाणून घ्यावी. नियमभंग आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.




Total Users : 615999