लोणी दि.१५( जनता आवाज वृत्तसेवा ):-यदांच्या गळीत हंगामाकरीता येणार्या ऊसाला प्रतिटन तीन हजार रुपये भाव देण्याचा शब्द डॉ विखे पाटील काखान्याने पूर्ण केला आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव देवून दिलासा देता आल्याचे समाधान खूप मोठे असल्याचे प्रतिपादन महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.
प्रथेप्रमाणे दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून लोणी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत मंत्री विखे पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.गावातील प्रश्नाबबात सभेत सामुहीकपणे चर्चा होवून याबाबत सर्वानुमते निर्णय करण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की,पद्मश्रीनी या ग्रामसभेची सुरूवात केली.खासदार साहेबांनी हा वारसा पुढे नेला.त्यांच्या शिकवणीवरच आज परंपरा पुढे घेवून जाण्याचे काम होत असल्याचा आनंद आहे.गावाच्या एकोप्यावरच विकास प्रक्रीया पुढे जात असल्याच्या उल्लेख त्यांनी आवर्जून केला.
राज्यात यंदा पावसाने दडी मारल्याने सर्वापुढे पाण्याचे संकट मोठे आहे.उपलब्ध पाण्याचे नियोजन करून शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणार असल्याचे स्पष्ट करून केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी हिताच्या योजनामुळे ग्रामीण भागाला दिलासा मिळत आहे.राज्य सरकारने एक रुपयात महत्वकांक्षी मोफत पीक विमा योजना सुरू केली.याचा मोठा आधार शेतकऱ्यांना मिळाला.आज नगर जिल्ह्याला १६० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.राहाता तालुक्या करीता सुमारे १२ कोटी रुपयांचा लाभ मिळाला असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
यावर्षी पद्मश्री विखे पाटील कारखान्याने मागील गळीत हंगाम करीता २हजार ७००रुपये भाव ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला होता.मात्र सहा महीन्यापूर्वीच यंदाच्या हंगामाकरीता तीन हजार रुपये भाव देण्याचे जाहीर केले त्याची अंमलबजावणी सुरू करून कारखान्याच्या संचालक मंडळाने आपला शब्द पूर्ण केला.दिवाळीच्या निमित्ताने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय करता आल्याचे समाधान खूप मोठे असल्याचे विखे पाटील म्हणाले.
लोणी बुद्रुक गावाकरीता सुरू असलेल्या पाणी योजनेचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.योजनेतील त्रृटी दूर करण्यासाठी सर्व गावकर्यांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
दिपावलीच्या निमिताने जिल्ह्यासह राज्यातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्विकार मंत्री विखे पाटील यांनी केला.प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरीकांची मोठी गर्दी होती.



