लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- केंद्र सरकारच्या धोरणामुळे बॅकींग क्षेत्रावरील सामान्य माणसाचा विश्वास अधिकच दृढ झाला आहे. सामान्य माणूस बॅकेच्या व्यवहारांशी थेट जोडला गेल्याने अर्थव्यवस्थेतही त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. प्रवरा सहकारी बॅंकेनेही सभासद आणि ठेवीदारांची विश्वासार्हता सांभाळून सुवर्ण महोत्सवी वर्षांची यशस्वी वाटचाल पुर्ण केली असल्याचे गौरोद्गार महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.
प्रवरा सहकारी बॅकेची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा बॅकेचे अध्यक्ष डॉ.भास्करराव खर्डे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. डॉ.सुजय विखे पाटील, डॉ.विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, व्हाईस चेअरमन मच्छिंद्र थेटे, सतिष ससाणे, ट्रक्स वाहतूक संस्थेचे चेअरमन नंदू राठी, व्हाईस चेअरमन सुनिल जाधव, शांतीनाथ आहेर, कारखान्याचे कार्यकारी संचालक महेश कोणापूर, सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर, बॅकेचे मुख्य कार्यकारी आधिकारी सौरभ बालोटे आदि याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील यांनी बॅकेच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या वाटचाली बद्दल शुभेच्छा देवून सांगितले की, अवघ्या पाच हजार रुपयांच्या ठेवीवर सुरु झालेले बॅंकेचे काम लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांची दुरदृष्टी दाखवून देते. ५० वर्षांपुर्वी त्यांनी पाहीलेले स्वप्न आज पुर्ण होत असल्याचे समाधान असून, या संपूर्ण वाटचालीत हजारो कुटूंबांना या बॅकेने आधार दिला. बॅकेच्या प्रगतीचा आलेखही दिमाखदारपणे उंचावत असल्याचे मोठे समाधान त्यांनी व्यक्त केले.
आज सहकारी बॅकींग क्षेत्राची परिस्थिती पाहाता प्रवरा सहकारी बॅकेने १३०० कोटी रुपयांच्या व्यवसायाचा पुर्ण केलेला टप्पा हा अभिमानास्पद असून, अनेक सहकारी बॅका आणि पतसंस्थांची पडझड होत असताना प्रवरा सहकारी बॅकेने आर्थिक शिस्त आणि पारदर्शकपणे केलेल्या कारभाराचे सामुहीक यश या संपूर्ण वाटचालित दिसून आले याकडे लक्ष वेधून मंत्री विखे पाटील म्हणाले की, केंद्रात सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर एकुणच सहकारी चळवळीला मोठा आधार मिळाला आहे. देशाच्या नव्या सहकार धोरणाचा मसुदा ठरविताना आता गावपातळीवरील सेवा सोसायट्यां पासून ते बॅकींग क्षेत्रापर्यंत सर्वच आर्थिक सहकारी संस्थाच्या प्रगतीचा विचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राथमिक सेवा सहकारी सोसायटी ही ख-याअर्थाने गावाची जीवन रेखा आहे. या सोसायट्यांनाही आता पुरक व्यवसाय करण्याची संधी सहकार धोरणामध्ये देण्यात आली आहे. दिडशे प्रकारचे व्यवसाय सुरु करण्यास सेवा सोसायट्यांना परवानगी देण्यात आली असल्याची माहीती देवून मंत्री विखे पाटील म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेचे पाच ट्रिलीयन डॉलर्सचे उदिष्ठ पुर्ण होत असताना बॅकींग क्षेत्राला मोठी संधी आहे. वाढलेली स्पर्धा लक्षात घेता. बॅकेतील मानव संसाधनामये अधिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. आवश्यक असलेल्या प्रशिक्षण तत्रज्ञानाचा अनुभव घेवूनच आता पुढची वाटचाल करावी लागेल.
याप्रसंगी बॅकेचे चेअरमन डॉ.भास्करराव खर्डे पाटील यांनीही बॅकेच्या वाटचालीचा आढावा घेतला. विषय पत्रिकेवरील सर्व विषय सर्वानुमते मंजुर करण्यात आले.
जिल्ह्यातील इतर बॅकांच्या थकबाकीची आकडेवारी पाहाता आपल्या बॅकेचा एनपीए शुन्य टक्के असून, सभासद व ठेवीदार यांच्या विश्वासामुळेच बॅकेच्या ठेवींमध्ये दोनशे कोटींनी वाढ झाली आहे. आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातून २०० युवकांना बॅकेने आर्थिक मदत केली असून राज्य सरकारच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत ३७ युवकांना प्रशिक्षणासाठी बॅकेने सामावून घेतले असल्याची माहीती मंत्री विखे पाटील यांनी दिली.



