श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- राज्याच्या स्थापनेपासून श्रीरामपूर मतदारसंघावर काँग्रेसची एकहाती सत्ता राहिलेली आहे.सत्तेच्या माध्यमातून घराणेशाही पोसणाऱ्यांनी आमदार,नगरसेवक,नगराध्यक्ष अशी पदे भोगलेली आहेत.
भविष्याचा विचार करुन शहर विकासाचे नियोजन त्यांनी कधीही न करता स्वतःच्या तुंबड्या भरून कार्यकर्ते पोसले.त्यामुळेच अतिक्रमणाची समस्या आज निर्माण झाली आहे.अशा सत्ता व पदे भोगणा-यांना अतिक्रमणाबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.पदे भोगून आता अश्रु ढाळणारे नाकर्ते नेते ढोंगी असल्याची परखड टिका राष्ट्रिय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी केली आहे.
श्रीरामपूर शहराच्या अतिक्रमणाच्या कारवाईबाबत बोलताना श्री.सागर बेग म्हणाले की,सन १९७० मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष माजी आ.स्व.ज.य.टेकावडे यांनी दूरदृष्टिने शहराचा विकास आराखडा तयार करुन सुंदर शहर वसवले.त्याचे राज्यभर आजही कौतुक होत आहे.
त्यानंतरआमदार,नगरसेवक,नगराध्यक्ष झालेल्यांनी शहराचे काहिच नियोजन केलेले नाही.त्यामुळेच आजची समस्या उदभवल्याचा आरोप श्री.बेग यांनी केला. शहरात मैदाने नाहीत,सार्वजनिक स्वच्छतागृह नाहीत,व्यापारी संकुल नाही,पार्किंग सुविधा नाही,विभागवार मंडई नाही अशा अनेक नागरी सुविधांचा अभाव आहे.असे असताना आता अतिक्रमणग्रस्तांबाबत सहानुभुती दाखविणारे व पदे भोगणारे तेंव्हा काय करीत होते असा प्रश्न पडतो.सत्ता वा पदे असताना त्यांनीच टपरीधारक संघटना काढून आतिक्रमणाला पाठबळ दिले.शासकीय जागेत झोपड्या वसवल्या.मनमानेल तिथे हप्ते घेवून टप-या टाकु दिल्या तर घराणेशाही सत्ताधाऱ्यांच्या बगलबच्च्यांनी अतिक्रमणात हात धुवून घेत स्वतःच्या टपऱ्या टाकल्या आणि त्या अतिक्रमणीत टपऱ्याना आजपर्यंत अभय देत वाचवल्या आणि त्या टपऱ्या भाडेतत्त्वावर देऊन भरमसाठ भाडे महिन्याला खाल्ले अशांचा अतिक्रमणग्रस्तांच्या पुनर्वसनात अजिबात विचार सुद्धा नाही केला पाहिजे उलट अशा अतिक्रमणाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असेही सागर बेग यांनी म्हंटले आहे.
निवडणुकीत वारेमाप आश्वासने देणारे शहरातील अतिक्रमण काढत असताना कोणत्या बिळात लपले होते असा प्रश्न ही श्री.बेग यांनी उपस्थित केला आहे.
अतिक्रमणाचा विषय सामान्यांच्या जीवनमरणाचा आहे.हा प्रश्न निवेदने देवून वा पञकार परिषदा घेवून,बैठका घेऊन सुटणार नाही.त्यासाठी मोठे जनआंदोलन उभे करावे लागेल.अतिक्रमण हटविले तसे या विस्थापितांच्या पुनर्वसनाची जबाबदारीही शासनाने स्विकारली पाहिजे.विस्थापितांना वा-यावर सोडता कामा नये.आजच्या स्थितीला गेली साठ वर्षे सत्ता व पदे भोगणारे काँग्रेसी जबाबदार आहेत.तेच ह्या पापाचे धनी आहेत.विस्थापितांचे पुनर्वसन व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे श्री.बेग यांनी सांगीतले.