वाघोली ( जनता आवाज वृत्तसेवा ):- पुणे ते शिरूर होणाऱ्या अत्याधुनिक एलिव्हेटेड फ्लायओव्हर उभारण्यात येणार असून भूसंपादनापूर्वी शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला ठरवून देणे आदी कामांकरिताचे प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आले असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम मार्च २०२५ मध्ये सुरू करण्याबाबत शासनाने सकारात्मकता दर्शविली आहे असे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले.
शिरूर-हवेली आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी वाघोलीतील वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना करण्यासाठी बैठक घेतल्यानंतर प्रशासनाने सर्जिकल स्ट्राईकने महामार्गाच्याकडेची अतिक्रमणे काढली. त्यानंतर कटके यांनी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील पुणे ते शिरूर या एलिव्हेटेड फ्लाय ओव्हरच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात होण्यासाठी पाठपुराव्यास सुरवात केली आहे.
मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ विभागाचे मुख्य अभियंता रणजीत हांडे यांच्याशी सदर प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शिरूर-हवेली मतदार संघासाठी महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या या ६० कि.मी. लांबीच्या प्रकल्पाची तातडीने सुरुवात करण्याबाबत संबंधीत विभागानेही सकारात्मकता दर्शविली आहे. हा अत्याधुनिक उड्डाणपूल खराडीपासून ते शिरूर बायपासपर्यंत होणार आहे. खराडी, लोणीकंद, शिक्रापूर, रांजणगाव आणि शिरूर या पाच ठिकाणी उड्डापुलाला एक्झीट असणार आहे. या तीन मजली उड्डाणपुलामुळे पुणे-नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या कायमची मार्गी लागणार असल्याचे आमदार कटके यांनी स्पष्ट केले.
या प्रकल्पांकरिता भूसंपादनापूर्वी बाधित शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. राज्यशासन शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देणार असून या कामाला प्रत्यक्षात मार्च २०२५ च्या महिन्याच्या अखेरीस सुरूवात होणार आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर पुणे शहरातील वाहतुकीवरील ताणही कमी होणार आहे.




Total Users : 624252