लोणी दि. ८ ,प्रतिनिधी
जिल्ह्याकडे आजपर्यंत फक्त राजकीय दृष्टीकोनातून पाहिले गेले. पालकमंत्री बाहेरचेच देण्यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न झाल्यामुळेच जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा कधी मांडला गेला नाही. ही परिस्थिती सर्वांच्या सहकार्याने बदलविण्याचा आपला प्रयत्न आहे. पर्यटना बरोबरच औद्योगिक विकासासाठी हा जिल्हा आता सर्वांना साद घालत आहे. माध्यमांनी सुध्दा या विकास प्रक्रीयेत सहभागी होवून मार्गदर्शकाची भूमिका बजवावी असे आवाहन महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून प्रवरा परिवाराच्या वतीने माध्यम प्रतिनिधींशी स्नेह संवादाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मंत्री ना.विखे पाटील यांनी सविस्तर भाष्य करुन, जिल्ह्याच्या तयार करण्यात येत असलेल्या विकास आराखड्यातील बाबींचे सविस्तर विवेचन केले.
याप्रसंगी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, शिर्डीचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.भास्करराव खर्डे, भगवती माता देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष भाऊसाहेब खर्डे, बाजार समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब जपे उपस्थित होते.
भौगोलिकद्ट्या जिल्हा मोठा असला तरी प्रत्येक तालुक्यात असलेल्या पायाभूत सुविधांचा उपयोग करुन, विकासात्मक प्रक्रीया साध्य होवू शकते यासाठीच आपला प्रयत्न आहे. विकास आराखड्याच्या बाबतीत आपण सर्वांच्याच अभ्यासपुर्ण सुचना मागवित असून, त्यानुसारच जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन परिपुर्ण होवू शकेल असा विश्वास व्यक्त करताना मंत्री ना.विखे पाटील म्हणाले की, औद्योगिक वसाहतींमधील समस्यांचे गांभिर्य मोठे असले तरी, यामध्ये सुधारणेला वाव आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने सर्व उद्योजकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीही या निमित्ताने प्रयत्न होतील. राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग आता निर्माण होत असल्यामुळे दळणवळण सोयीस्कर होत आहे. उपलब्ध असलेल्या जमीनींवर स्वतंत्र आयटीपार्क, कृषि प्रक्रीया उद्योग उभारले गेले तर, या माध्यमातून रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होवू शकतात असे मतही त्यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तिर्थस्थान आहेत, तिर्थक्षेत्र पर्यटन हासुध्दा विकासाच्या प्रक्रीयेचा एक भाग होवू शकतो. जिल्ह्यात श्रध्दा स्थानांकडे येणा-या भाविकांची संख्या पाहाता या तिर्थक्षेत्रांच्या विकासाचे नियोजन झाले तर, त्या भागातील अर्थकारणाला नवी दिशा मिळून स्थैर्यही मिळू शकते. याकडे लक्ष वेधून अकोले तालुक्यात निसर्ग पर्यटनासाठी मोठ्या संख्येने ट्रेकर येतात. या भागातही रोजगार उपलब्धतेच्या मोठ्या संधी आहेत. परंतू या भागातील तरुणांनीही पुढे येवून या विकास प्रक्रीयेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.सरकार सर्वोतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
या विकासाच्या नियोजनात सर्वांचेच सहकार्य लागणार आहे. कारण आत्तापर्यंत जिल्ह्याकडे राजकीय दृटीकोनातूनच पाहीले गेले. जिल्ह्यातला माणूस पालकमंत्री होवू नये म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न झाले. त्यामुळे विकासाच्या चर्चा झाल्या नाहीत. परंतू ही परिस्थिती बदलविण्यासाठी आता सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करायचे आहेत.
जिल्ह्यातील अनेक भूमीपुत्र देशात आणि परदेशात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी नवीन काय करता येईल अशा सुचनाही आपण त्यांच्याकडून मागवत आहोत. हे सर्व भूमीपुत्र एकत्र आले तर विकासाचा नवा प्लॅटफॉर्म तयार होवू शकेले. या विकासाच्या प्रक्रीयेत माध्यमांची भूमिकाही आमच्या दृष्टीने महत्वपुर्ण आहे. यासाठी आपणही या विकास प्रक्रीयेचे भागीदार व्हा अशी इच्छा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली या स्नेह संवाद कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.डॉ.राजेंद्र सलालकर यांनी केले.
खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना पालकमंत्री पद आता नगर जिल्ह्याकडे आल्याने प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करण्याची संधी मोठी मिळाली आहे, तसे प्रयत्नही सुरु झाले आहेत. परंतू सामाजिक जबाबदा-याही वाढत आहेत याकडे लक्ष वेधून जिल्ह्यामध्ये धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांचे गांभिर्य माध्यमांनी ओळखून याबाबत जागृती करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.