लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):–नेहमीच दुष्काळी परीस्थीतीला सामोरे जाव्या लागणा-या अहिल्यानगर जिल्ह्याला पाण्याचा चांगला दिलासा मिळाला आहे. जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदा विभागाने लोकप्रतिनिधी व लाभधारक शेतकरी यांच्यामध्ये योग्य सुसंवाद साधल्याने तापलेल्या कडक उन्हाळ्यातही पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या आवर्तनाचे यशस्वी नियोजन गोदावरी, मुळा आणि भंडारदारा धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये झाल्याने समाधानाचे वातावरण आहे.
धरण समूहातील उपलब्ध पाणी साठ्याची साथ बळीराजाला मिळाली. यापुर्वी जायकवाडीला सन २०१२ ते सन २०२४ या तेरा वर्षाच्या कार्यकाळात सहावेळा पाणी सोडावे लागले. यंदा पाणी सोडावे लागले नाही हे प्रथमच घडल्याने धरणामध्ये पाणीसाठी टिकून राहीला. आवर्तनाच्या संदर्भात मंत्री विखे पाटील यांनी नियमतपणे आढावा घेवून केलेल्या सूचनांमुळे आवर्तनाची यंदा कुठेही हेळसांड झाली नाही. आवर्तन सुस्थितीत पार पडल्याने शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामात पाण्याची उपलब्धता होवू शकली.
अहिल्यानगर जिल्ह्यात धरणांची संख्या मोठी असली तरी, पाणी टंचाईची समस्या कमी नाही. उपलब्ध पाणी साठ्याने प्रमुख धरणं भरली तरी, समन्यायी पाणी वाटप कायद्याचे भूत जिल्ह्याच्या मानगुटीवर कायम असते. धरणातील पाणी साठ्यावरच वर्षभरातील सर्व हंगामातील आवर्तनाचे नियोजन जलसंपदा विभागाला करावे लागते.
यापुर्वी जायकवाडीला पाणी सोडावे लागल्याने त्याचे परिणाम मुळा, भंडारदरा व गोदावरी धरण समूहाच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांना भोगावे लागले. यावर्षी उन्हाची तिव्रता भीषण होती, धरणातील उपलब्ध पाणी साठ्यावर आवर्तनाचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान जलसंपदा विभागा समोर होते. मात्र जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा आणि गोदावरी लाभक्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधी, लाभधारक आणि विभागाच्या अधिका-यांमध्ये योग्य समन्वय साधत आवर्तनाचे नियोजन केले.
गोदावरी कालव्यांना रब्बी हंगामात एक आणि उन्हाळी हंगामात तीन आवर्तने देण्यात आली. दोन्ही हंगामातील आवर्तनात एकूण साडेपाच हजार दलघफु पाण्याचा वापर झाला. भंडारदरा प्रकल्पातून प्रवरा कालव्यांना खरीप हंगामात एक, रब्बी हंगामात सिंचनाकरीता दोन व बिगर सिंचनाकरीता एक तसेच उन्हाळी हंगामात सिंचनाकरीता एक व बिगर सिंचनासाठी एक अशा सहा आवर्तनाचे यशस्वी नियोजन झाल्याने दोन्ही हंगामात ८६, ३२५ हेक्टर क्षेत्र सिंचित झाले.
मुळा प्रकल्पांतर्गत सिंचनासाठी रब्बी मध्ये दोन आणि उन्हाळ्यात एक आवर्तन देण्यात आले. रब्बी आणि उन्हाळ्यात दोन्ही आवर्तनातील सिंचनाकरीता १२,७९३ दलघफु पाणी वापर झाला. जिरायत भागाला वरदान ठरलेल्या निळवंडे प्रकल्पाच्या माध्यमातून रब्बी आणि उन्हाळी हंगामात एकुण तीन आवर्तन दिली गेली. डाव्या आणि उजव्या कालव्यांना पाणी दिल्याने लाभक्षेत्रातील जवळपास आठशेपेक्षा जास्त बंधारे, पाझर तलाव भरले गेले. लाभक्षेत्रात गावोगावी असलेले ओढे, नाले प्रवाहित केले. यामुळे पाणी टंचाईची समस्या असलेल्या गावांनी पाणी मिळाल्याचे समाधान व्यक्त केले आहे. परंतू यापेक्षाही महत्वाचे म्हणजे जमीनीतील आणि विहीरीच्या पाणी पातळीत झालेली वाढ झाल्याने पिकांना याचा चांगला फायदा होईल असे सांगितले जाते. निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी देणार हा शब्द मंत्री विखे पाटील यांनी कृतीत उतरवून दाखवला.
यापुर्वी मुळा धरणातून जायकवाडीसाठी सन २०१४ मध्ये ३ हजार ८०७ द.ल.घ.फु, २०१५ मध्ये १ हजार ६०८ द.ल.घ.फु, २०१८ मध्ये १ हजार ९०८ द.ल.घ.फु, आणि २०२३ मध्ये १ हजार ९०६ द.ल.घ.फु, पाणी सोडावे लागले होते. मात्र सन २०२४ मध्ये जायकवाडीला पाणी सोडले नाही. मुळा धरणात सध्या १० हजार ३८८ म्हणजे ३९.९५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, जिवंत साठा ५ हजार ८८८ म्हणजे २७.३८ टक्के इतका आहे.
हीच परिस्थिती भंडारदरा धरण समूहाची राहीली. यंदा उन्हाळी हंगामात सर्व आवर्तनांचे योग्य नियोजन विभागाने यशस्वी केले. सध्या भंडारदरा धरणात ३.९० टिएमसी आणि निळवंडे धरणात २ हजार ७०१ टिएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. यापुर्वी जायकवाडीला भंडारदरा धरण समुहातून २०१४-१५ साली ४.३ टिएमसी, २०१५-१६ वर्षात ६.५० टिएमसी, २०१८-१९ मध्ये ३८५ टिएमसी २०२३-२४ मध्ये ३.७५६ टिएमसी पाणी सोडण्यात आल्याने लाभक्षेत्राला मोठा फटका बसला होता. यावर्षी जून महीन्यातच झालेल्या पावसाने जायकवाडी मध्येही चांगला पाणी साठा झाल्याचा दिलासा अहिल्यानगरला सुध्दा मिळेल आशी अपेक्षा व्यक्त होवू लागली आहे.
जिल्ह्याला ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जलसंपदा विभागाचे मंत्रीपद मिळाल्यानंतर विभागाचे आधिकारी थेट गावात जावून शेतक-यांच्या समस्या जाणून घेत आहेत. आवर्तनाच्या काळात आधिकारी प्रत्येक गावाला आणि शेतक-यांना पाणी मिळाले का नाही याची दखल घेताना दिसले. यापुर्वी आशी परिस्थिती कधी पाहायला मिळाली नव्हती. मंत्री विखे पाटील यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठका कार्यक्षेत्रात जावून घेतल्याने त्या भागातील वास्तव परीस्थीती समोर आली, वस्तुनिष्ठ निर्णय घेतले गेले. याचे प्रतिबिंब जिल्ह्याच्या सिंचन व्यवस्थापनामध्ये दिसून आले आहे. हा बदल लाभाक्षेत्रातील शेतकऱ्यांना सुखावणारा आहे.
कुकडी प्रकल्पाची कालवा सल्लागार बैठक यापूर्वी नेहमी पुण्यात घेतली जात होती. ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी यंदा कुकडी प्रकल्पाची बैठक अहिल्यानगरमध्ये प्रथमच घेवून, कुकडी अंतर्गत जिल्ह्याच्या येणा-या लाभक्षेत्रातील शेतक-यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. यापुर्वी कालवा सल्लागार समितीच्या सर्व बैठका या पुण्यात घेतल्या गेल्या. ना. विखे पाटील यांच्या कार्य काळातील हा बदल जिल्हयाच्या हक्काच्या पाण्यासाठी टाकलेले पहीले यशस्वी पाऊल म्हणावे लागेल.