जालना(जनताआवाज वृत्तसेवा ):- मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असून, उपोषणाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी राज्य सरकारसमोर मोठी मागणी ठेवली आहे. मराठा समाजाच्या कल्याणासाठी आपण हे आंदोलन करत असल्याचे सांगताना, सरकार बदलत राहतील, चर्चा सुरू राहतील; मात्र आपण उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. त्यांनी शेतात उन्हात बसून उपोषण करणार असल्याचे जाहीर केले असून सरकारसोबत चर्चा देखील उन्हातच करणार असल्याचे सांगितले आहे.
विखे पाटील भेटीसाठी रवाना
मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी छत्रपती संभाजीनगरवरुन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील निघाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील हे उपोषण मागे घेणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भर उन्हामध्येच आपण सरकारसोबत चर्चा करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
शाहू महाराजांचा आंदोलनाला पाठिंबा
शाहू महाराजांचा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा मिळाला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना खा. शाहू महाराज यांनी आपला जरांगे यांना पाठिंबा असल्याचे सांगितले. वास्तविक कुणबी आणि मराठा एकच असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकार आणि जरांगे यांच्यात काय चर्चा सुरू आहे. हे आम्हाला कळतच नाही. असेही त्यांनी सांगितले.



