spot_img
spot_img

‘नगरचे अनेक नेते मूळ काँग्रेसचे; सत्तेच्या दिशेने त्यांची वाटचाल’ – संजय राऊत शिर्डीतून भाजप व शिंदे गटावर टीका; शिवसेना पुन्हा संघटनबांधणीसाठी सज्ज असल्याचा दावा

शिर्डी(जनता आवाज वृत्तसेवा):- “अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक नेते मूळचे काँग्रेसचे असून सत्तेच्या समीकरणानुसार त्यांनी पक्षांतर केले आहे. सत्ता कुठे आहे, यानुसार त्यांची राजकीय भूमिका बदलत असते,” असा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप व शिंदे गटावर जोरदार टीका केली. आगामी अडीच वर्षे पक्ष संघटनबांधणीवर भर देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शिर्डी येथील सन अँड सॅंड हॉटेलमध्ये आयोजित अहिल्यानगर शहर शिवसेनेच्या संघटनात्मक आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना राऊत बोलत होते. ग्रामीण जिल्हा शिवसेनेच्या मेळाव्यानिमित्त ते शिर्डी दौऱ्यावर आले होते.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ शिवसेनेचे प्रतिनिधित्व राहिल्याचा उल्लेख करत राऊत म्हणाले, “एखादी निवडणूक पराभूत झाल्याने पक्ष कमकुवत झाला किंवा संपला असे होत नाही. शिवसेना हा महाराष्ट्रातील जनमानसात रुजलेला पक्ष आहे. काही भागांमध्ये मतदार निर्भयपणे मतदान करू शकत नाहीत, अशी परिस्थिती अद्यापही आहे. मात्र, शिवसेनेची ताकद कायम आहे.”

राज्यात सध्या कोणतीही मोठी निवडणूक नसल्याने आगामी काळ पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी वापरणार असल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण असल्याचा दावा केला.

भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवर टीका करताना राऊत म्हणाले, “या जिल्ह्यातील अनेक नेते मूळ काँग्रेसचे आहेत. आपली संस्थाने आणि राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला. पूर्वी शिवसेनेची सत्ता असताना हेच नेते शिवसेना नेतृत्वाच्या जवळ होते. त्यामुळे त्यांची भूमिका तत्त्वांपेक्षा सत्ताकेंद्रांशी जोडलेली असल्याचे दिसते.”

शिंदे गटावरही त्यांनी निशाणा साधला. “शिवसेना हा महाराष्ट्राच्या राजकारणातील कायम मोठा भाऊ राहिला. हे मोठेपण काहींना मान्य नव्हते. त्यामुळे पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला. शिंदे गट हा स्वतंत्र विचारांचा नसून केंद्रीय नेतृत्वाच्या प्रभावाखाली काम करत असल्याचे दिसते,” असा आरोप त्यांनी केला.

राऊत यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटासह भाजपवरही विविध राजकीय मुद्द्यांवर टीका केली. त्यांच्या वक्तव्यांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान, राऊत यांच्या टीकेला भाजप व शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!