वाकडी( जनता आवाज वृत्तसेवा ):-अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र धनगरवाडी येथे योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दि. १८ ते २५ ऑगस्टदरम्यान करण्यात आले आहे. वारकऱ्यांचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सप्ताहाच्या पूर्वतयारीचा आ विवेक भैय्या कोल्हे यांनी सप्ताहस्थळी भेट देऊन आढावा घेतला.
यावेळी सप्ताह कमिटीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत विविध कामांची माहिती घेतली. तसेच ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या.
महाराष्ट्राच्या विविध भागांतून लाखो भाविक व वारकरी या सप्ताहासाठी धनगरवाडी येथे येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियोजन, आरोग्य व आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेतला.
सद्गुरू योगीराज श्री गंगागिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने मागील १७८ वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही भक्तीमय परंपरा यंदा १७९ व्या वर्षात पदार्पण करत आहे. वारकऱ्यांचा हा महाकुंभ भक्तिमय, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा, यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी दिली.
याप्रसंगी श्रीक्षेत्र धनगरवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने आ कोल्हेंचा सन्मान करण्यात आला.
यावेळी धनगरवाडी सप्ताह कमिटी, पंचक्रोशीतील भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते.




Total Users : 615836