राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):-श्रावणी अमावस्येच्या मध्यरात्रीच्या वेळी राहुरी शहरातील नगर-मनमाड महामार्गावर हॉटेल रुबाबसमोर गुरुवारी मध्यरात्री १२:३० ते १:०० वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन युवकांचा मृत्यू झाला असून एक महिला जखमी झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम तनपुरे व अनिकेत तनपुरे हे हॉटेलमध्ये जेवण करून दुचाकी क्रमांक एमएच १७ डीके ४४११ वरून घरी जात होते. त्याचवेळी अकोले येथील ऋषिकेश बाळासाहेब गिऱ्हे (वय १९) हे एका महिलेसोबत दुचाकी क्रमांक एमएच १७ सीडब्ल्यू ६८११ वरून नगरच्या दिशेने श्री क्षेत्र मढी येथे देवदर्शनासाठी जात होते.
हॉटेल रुबाबसमोर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की ऋषिकेश बाळासाहेब गिऱ्हे यांचा जागीच मृत्यू झाला.
तर गंभीर जखमी झालेल्या अनिकेत तनपुरे यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. शुभम तनपुरे यांच्यावर राहुरी येथील लाईफ इन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातातील महिला जखमी असल्याची माहिती आहे.अपघाताची माहिती मिळताच संबंधितांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेमुळे नगर-मनमाड महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.
घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गिते व पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाणगे करीत आहेत




Total Users : 636105