राहाता ( जनता आवाज वृत्तसेवा ):- सरकारला मराठा आरक्षण देण्यासाठी पुरावे मिळत नव्हते, पण समितीने पाच हजार पुरावे गोळा केले आहेत आता कायद्याला आधार द्यायला व कायदा पारित करायला सरकारला अडचण नाही. सरकारने ४० दिवसांत कायदा पारित करून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावेत. मराठा समाज आता गप्प बसणार नाही . आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही व सरकारला सुट्टी नाही . सरकारला मराठा आरक्षण द्यावेच लागेल, असे आवाहन मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी राहाता येथ आयोजित सभेत केली.
जरांगे पाटील म्हणाले, १ जून २००४ चां सुधारित जी.आर आरक्षणाचा पर्याय त्यांच्यापुढे आहे. मराठा कुणबी एकच आहे. गायकवाड कमिशनने मराठ्यांना मागास सिद्ध केले आहे. सरकारसमोर आता कुठलीही अडचण नाही; पण सरकार व समिती दिशाभूल करत आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा समाजाला मराठा हाच वेगळा प्रयोग तयार करून ५० टक्क्याच्या आत आरक्षण सरकार देऊ शकते. ज्या कायद्यात मराठ्यांचे हित नाही, तो कायदा पारित केलेला आम्ही स्वीकारणार नाही. मी दिलेल्या शब्दात कुठेही बदलणार नाही व सरकारलाही बदलू देणार नाही. होणारा विजय महाराष्ट्रातील मराठ्यांचा असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षण अंतिम टप्प्यात आहे. सरकार आपल्याकडून एक महिन्याचा वेळ घेऊन गेले. १४ ऑक्टोबरला सरकारचा एक महिना पूर्ण होणार आहे. त्यात आपण सरकारला आणखी १० दिवस दिले आहेत. २४ ऑक्टोबरला सरकारला दिलेला ४० दिवसांचा वेळ पूर्ण होत आहे. सरकार आणि समितीची पळापळ सुरू आहे. आपण आपल्या शब्दांवर ठाम आहोत, जिवंत असेपर्यंत ठाम राहणार. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. मराठा समाजाशी मरेपर्यंत गद्दारी करणार नाही. सरकारने कितीही डाव टाकू द्या; सर्व डाव उधळून लावणार.
१४ ऑक्टोबरला प्रत्येक मराठी समाज बांधवांनी आपल्या कुटुंबासमवेत आंतरवलीला येऊन आपली ताकद सरकारला दाखवून देऊ आरक्षण मिळवण्याकरिता कोणीही आत्महत्या करू नका आपणच जर राहिलो नाही तर आरक्षण मिळवून काय फायदा आपण सर्वांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचे आहे. या आंदोलनासाठी ३५ मराठी बांधवांनी बलिदान दिले आहे. मराठी समाज हा शेती कसणारा समाज आहे. त्यामुळे सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी हा लढा पहिला व शेवटचा आहे. आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला . या सरकारने १९३१ ब्रिटिश कालीन जनगणनेच्या आधारावर आरक्षण देण्याचे काम केले आहे. मराठी समाजाने कधीही जातिवाद केला नाही. ७५ वर्ष मराठा समाजाने सर्व पक्ष व विविध पक्षातील नेत्यांना मोठे करायचे काम केले आहे. ओबीसी समाज व आपण सर्व एकच आहोत.१९१३ पासून मराठा समाजाला आरक्षण लागू आहे. कुठली चौकशी न करता ओबीसी समाजाला ६० टक्के मराठा समाजाला ३४ टक्के मग इतर समाजाची आरक्षणाची टक्केवारी किती असा सवाल यावेळी जरांगे यांनी करत सरसकट आरक्षण देण्याची मागणी केली. साडेबारा वाजता होणारी सभा दुपारी २ वाजता सुरू झाली, तरीही मराठा समाज भर उन्हात मोठ्या संख्येने हजर होता. सभेचे नियोजन उत्कृष्ट होण्याकरिता अनिल बोठे, चंद्रशेखर कार्ले, ताराचंद कोते ,दशरथ गव्हाणे, वीरेश बोठे,सागर सदाफळ, आकाश गाढे, पंकज शिंदे, विशाल बोठे, प्रसाद बोठे ,सचिन बोठे, मुन्ना सदाफळ, आदी सकल मराठा समाज बांधवांनी मेहनत घेतली. यावेळी मुकुंदराव सदाफळ, सोपानराव सदाफळ, कैलास सदाफळ, कमलाकर कोते, नितीन कापसे, राहुल सदाफळ, सर्जेराव मते, विजय सदाफळ, डॉ ,महेश गव्हाणे , तसेच मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी जि. प अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी सभेला उपस्थित राहून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील आरक्षण मिळण्याकरिता प्रयत्न करीत असून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राहाता येथील सभेसाठी येणाऱ्या नागरिकांना मुस्लिम समाज बांधवांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती



