नगर (जनता आवाज वृत्तसेवा ):- पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने २२ ते २५ फेब्रुवारी, २०२४ दरम्यान येथील भिस्तबाग महल शेजारील मैदान, तपोवन रोडजवळ, अहमदनगर येथे ‘महासंस्कृती महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले असुन त्यानिमित्ताने येथील प्रोफेसर चौक येथे शोभा यात्रा व ढोलपथक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवत या शोभायात्रेचा शुभारंभ केला.
रेसिडेन्शियल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी, विद्यार्थीनींनी शोभायात्रेमध्ये लेझीम, रिबनद्वारे तसेच हाती पताका घेत उत्तम असे सादरीकरणे केले. युगंधर वाद्यपथकाने ढोलद्वारे उपस्थितांची मने जिंकली तर आदिवासी बांधवांनी विविध प्रकारचे आदिवासी नृत्य सादर करत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले. कृषी विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या चित्ररथातून पौष्टिक तृणधान्याचे मानवी जीवनातील महत्व हा संदेश देण्यात आला.
ही शोभायात्रा प्रोफेसर चौक येथून निघून भिस्तबाग महल शेजारील मैदान या कार्यक्रमस्थळी विसर्जित करण्यात आली. या शोभायात्रेस विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक तसेच विद्यार्थी,विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



