लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):-बदलापूरची घटना अतिशय दुर्दैवी होती, सर्वच समाज घटकांनी या घटनेचा निषेध केला आहे. बदलापूर मध्ये सरकारने कारवाईसाठी निर्णय घेतले आहेत. मात्र महाविकास आघाडीकडून जाणीवपुर्वक या घटनेचे राजकारण सुरु आहे. बदलापूरला तातडीने जाणारे महाविकास आघाडीचे नेते पश्चिम बंगालमध्ये एवढी मोठी घटना घडली असताना त्याबाबत गप्प का राहीले असा सवाल महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, बदलापूरच्या घटनेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने एसआयटी नेमून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. घटनेच्या तपासात हलगर्जीपणा करणा-या पोलिस आधिका-यांवरही कारवाई झाली आहे. सरकारने या पीडीत मुलींना न्याय देण्यासाठी हा घटला जलद गती न्यायालयात चालविण्याचा निर्णय घेतलेला असताना केवळ या घटनेच्या आडून राजकारण करण्याची भूमिका ही महाविकास आघाडीच्या नेत्यांची आहे.
मात्र दुसरीकडे पश्चिम बंगाल मध्ये सुध्दा घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी होती. या घटनेचा जगामध्ये निषेध झाला मात्र महाविकास आघाडीचे नेते या घटनेचा निषेध करायला सुध्दा तयार नाहीत. याचाच अर्थ महाविकास आघाडीच्या नेत्यांना ममता बॅनर्जी यांच्या पदराखाली लपायचे आहे असा मार्मिक टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावताना अतिशय संवेदनशिल अशा घटनेवर संजय राऊत अतिशय वेगळ्या थराला जावून बोलतात, त्यांनी जनाची नाही तर मनाची ठेवली पाहीजे. महाविकास आघाडीने पुकारलेला बंद म्हणजे केवळ भावनेला हवा देवून उद्रेक करण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे.
कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, आम्ही आरश्यात दिसण्याची वाट का पाहाता, धनाजी, संताजी सारखे आम्हीच तुम्हाला दिसतो कारण आमचे सरकार काम करणारे आहे. तुमच्याकडे कोणी पाहत नाही म्हणूनच बदलापूरच्या घटनेचा केवीलवाणा राजकीय प्रयत्न अतिशय दुर्दैवी आहे.