कोपरगांव(जनता आवाज वृत्तसेवा):- इंटस फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीने संजीवनी फार्मसीच्या एकाचवेळी आठ विद्यार्थ्यांना आकर्षक पॅकेज देऊन नोकरीची संधी दिली. या महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या नियोजनबध्द पुढाकारामुळे या विद्यार्थ्यांची तसेच त्यांच्या पालकांची स्वप्नपूर्ती झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांत, बी. फार्मसीच्या एक व एम. फार्मसीच्या सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अंतिम वर्षाच्या परिक्षेचा निकाल हाती येण्यापूर्वीच या विद्यार्थ्यांना आपले करिअर सुरू करण्याची सुवर्णसंधी मिळाली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांत एम. फार्मसीच्या दिव्येश रमेश म्हात्रे, कृष्णा रामहरी गोरे, झुंबर रामनाथ पोटे, तुषार नवनाथ पाटील, ऋतिक दत्तु काळे, विवेक विष्णू पारखे, यश दिपक कदम व बी. फार्मसीच्या अतुल मच्छिंद्र आहेर यांचा समावेश आहे.
संजीवनी फार्मसी महाविद्यालयास ऑटोनॉमस दर्जा प्राप्त आहे. त्यामुळे काळाच्या गरजेनुसार उद्योगाभिमुख आणि आधुनिक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवीणे शक्य होते. त्याचा परिणाम म्हणून, महाविद्यालयातील विद्यार्थी विविध नामांकित कंपन्यांच्या नोकरीसाठी आवश्यक असलेल्या कसोट्यांत यशस्वी ठरत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची उत्तम जडणघडण होऊन त्यांच्या हाती परिक्षेपूर्वीच नोकरीची आर्डर पडते आहे. त्यामुळे पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संजीवनीचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिंनदन केले. कार्यकारी विश्वस्त श्री अमित कोल्हे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डायरेक्टर डॉ. विपुल पटेल, हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डॉ. रावसाहेब शेंडगे , टी अँड पी विभागाचे डीन डॉ.प्रमोद कडू उपस्थित होते.



