spot_img
spot_img

सत्तेतील आमदार असलात तरी लोकहितासाठी वेळप्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करा डॉ. सुजय विखे पाटील यांचा आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांना सल्ला

नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा):-अधिकारी जनतेची कामे वेळेत करत नसतील, तर सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी लोकहितासाठी वेळप्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यास घाबरू नये, असा स्पष्ट सल्ला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांना दिला. सत्ता आणि पदापेक्षा जनता मोठी असून, लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हे जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्यासाठीच असतात, असे प्रतिपादन त्यांनी केले.

नेवासा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियानाचा शुभारंभ यावेळी मान्यवरांचा उपस्थितीत करण्यात आला. त्या आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले, अधिकारी काम करत नसतील, तर आंदोलन करा. तुम्ही सत्तेत असलात, महायुतीचे आमदार असलात तरी लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्यास मागे-पुढे पाहू नका. तुम्ही आंदोलन केले तर मी स्वतः तुमच्यासोबत येईन. माझे वडील पालकमंत्री असले तरी मी जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलनात सहभागी होईन. प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे जनतेची कामे करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी नगराध्यक्ष करण घुले तसेच शासकीय अधिकारी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिकाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले की, पूर्वी ज्या पद्धतीने काम चालत होते, ती कार्यपद्धती आता बदलण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्य नागरिकांशी सन्मानाने वागावे, त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे आणि त्यांना शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारायला लावू नयेत. जनतेला तुमची खुर्ची किंवा गाडी नको आहे, त्यांना वेळेत न्याय आणि सन्मानाची वागणूक हवी आहे, असे ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की नेवासा तालुका गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसून, महिलांवरील अत्याचार, बलात्कार, खून यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल. गुन्हेगारांच्या मतांसाठी तत्त्वांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याचबरोबर शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या माध्यमातून हजारो नागरिकांना दिलासा मिळत असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

यावेळी बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या च्या माध्यमातून अवघ्या एका महिन्यात पाच हजारांहून अधिक नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला आहे. शासनाच्या सेवा व सुविधा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान प्रभावी ठरत असून, सर्वसामान्यांना शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी पदापेक्षा जनतेची सेवा महत्त्वाची असल्याचे सांगितले. पद मिळविण्यापेक्षा गरिबांचे प्रश्न सोडविणे हेच सर्वात मोठे कार्य आहे. समाजसेवा करणाऱ्यालाच जनता कायम साथ देते,असे सांगत पदाच्या राजकारणात न अडकता जनतेची कामे करण्याचे आवाहन त्यांनी केले.

नेवासा तालुक्यातील रस्ते, जमीनविषयक वाद आणि महसूल प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी महसूल प्रशासनाने घटनास्थळी जाऊन निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अधिकारी काम करत नसतील, तर लोकप्रतिनिधींनीही जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्यास मागे-पुढे पाहू नये. सत्ता नव्हे, तर जनता मोठी असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी सांगितले की, तालुक्यातील ११ मंडळांमध्ये आयोजित २२ शिबिरांमधून सुमारे ७ हजार ५०० नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. डिजिटल सातबारा, वारस नोंद, फेरफार यांसह महसूल विभागाच्या विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. यासाठी १३ विविध शासकीय विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते.

महिला सक्षमीकरणाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, तालुक्यात २ हजार ३५ बचत गट कार्यरत असून त्यामध्ये २५ हजार ५०० महिला सहभागी आहेत. अधिकाधिक महिला बचत गट स्थापन करून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नेवासा शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमणधारकांच्या प्रश्नावर संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल. तसेच तालुक्यातील सिंचन आणि पाणी नियोजनासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांचेही आमदार लंगे पाटील यांनी कौतुक केले.

आरोग्य सेवांबाबत बोलताना त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्थानिक पातळीवर अधिकाधिक उपचार उपलब्ध करून देण्यावर भर दिला. गंभीर रुग्णांना उच्चस्तरीय रुग्णालयात तातडीने उपचारासाठी पाठविण्याची सक्षम व्यवस्था उभारली जात असून, नव्याने बांधण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी निवासस्थानी डॉक्टर वास्तव्यास राहतील, याचीही दक्षता घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संघर्षातून पुढे आलेले नेतृत्वच विकासाला गती देऊ शकते, असे सांगत डॉ. सुजय विखे पाटील यांनी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. महायुती सरकारच्या माध्यमातून नेवासा तालुक्यातील सर्व प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी व पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

नेवासा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच विस्तृत बैठक घेण्यात येणार असून, अतिक्रमण नियमितीकरण, शहर विकास आणि गुन्हेगारीवर नियंत्रण यासाठी ठोस निर्णय घेतले जातील. अतिक्रमण आणि अवैध व्यवसायांमधून अनेकदा गुन्हेगारीला खतपाणी मिळते. त्यामुळे अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करून नेवासा तालुका गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्रितपणे काम करतील, असा विश्वास डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!