श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ) : – पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित विराट हिंदू संमेलनात हिंदू धर्मरक्षक सागर बेग यांनी हिंदू समाजाने एकजूट होण्याचे आवाहन केले. विविध धार्मिक, सामाजिक आणि कायदेविषयक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य करत सध्याच्या परिस्थितीवर तीव्र शब्दांत टीका केली.
कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून सिनेअभिनेते रमेश परदेशी (मुळशी पॅटर्न फेम), धर्मजागरणचे प्रांत कार्यकारिणी सदस्य सुनील काळे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद एकबोटे उपस्थित होते.
या वेळी बोलताना बेग यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वारशाचा उल्लेख करत, त्यांच्या नावाचा राजकीय वापर होत असल्याची टीका केली. “महाराजांच्या नावावर राजकारण केले जाते; मात्र त्यांच्या अपमानाविरोधात कठोर कायदा करण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत,” असे ते म्हणाले.
कायदेविषयक मुद्द्यांवर भाष्य करताना त्यांनी लव्ह जिहाद, गोहत्याबंदी आणि बालकांवरील अत्याचारांबाबत कठोर कायद्यांची आवश्यकता व्यक्त केली. “कायदे कडक असले तरी अंमलबजावणी प्रभावी नसल्याने आरोपींना धाक राहत नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
संमेलनात विविध वक्त्यांनी धार्मिक जागरूकता, सामाजिक ऐक्य आणि कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी यावर मार्गदर्शन केले. मिलिंद एकबोटे यांनी सर्वसमावेशक आणि अभ्यासपूर्ण भाषण करत सामाजिक प्रश्नांवर विचार मांडले, तर रमेश परदेशी व सुनील काळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास राष्ट्रीय श्रीराम संघाचे तालुकाध्यक्ष मदनभाऊ मोकाटे, संकेत चव्हाण, तुषार थेटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



