श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- अवैध सावकारी व सततच्या त्रासाला कंटाळून हरेगाव परिसरातील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत.
राजेंद्र आण्णासाहेब ताके (वय ४५, रा. टाके वस्ती, खैरी रोड, हरेगाव) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
फिर्यादी रोहिणी राजेंद्र ताके यांच्या तक्रारीनुसार, मयताने शेतीकामासाठी आरोपींकडून ५० हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यानंतर आरोपींनी सतत पैशासाठी तगादा लावत शेतजमीन व शेतमालावर ताबा मिळवला तसेच शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप आहे.
या त्रासाला कंटाळून मयताने ३१ मे रोजी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून तिघांच्या त्रासामुळे जीवन संपवत असल्याचे नमूद केल्याची माहिती फिर्यादीत देण्यात आली आहे.
या प्रकरणी कॉइन विठ्ठल पंडित, सुजित गायकवाड (रा. हरेगाव) आणि सुरेश भास्कर ढोबळे (रा. माळेवाडी) यांच्याविरुद्ध बीएनएस कलमे व सावकारी अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.



