श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा) :-पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी कथित सोशल मीडिया संपर्क असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी पहाटे श्रीरामपुरात धडक कारवाई केली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने शहरातील विविध भागांत शोधमोहीम राबविण्यात आली. या कारवाईत काही युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मात्र, याबाबत एटीएसने अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, एटीएसचे पथक गुरुवारी रात्रीच श्रीरामपुरात दाखल झाले होते. शुक्रवारी सकाळी वॉर्ड क्रमांक २ तसेच शहराच्या मध्यवस्तीतील काही ठिकाणी एकाचवेळी छापे टाकण्यात आले. संशयितांच्या घरांची झडती घेऊन त्यांच्याकडील मोबाईल फोन व सोशल मीडिया व्यवहारांची पडताळणी करण्यात आल्याचे समजते.
तपास यंत्रणांच्या रडारवर असलेल्या काही युवकांनी पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीच्या सोशल मीडिया खात्यांवरील रील्स, व्हिडिओ किंवा पोस्टला ‘लाईक’ केल्याची, तसेच संबंधित ग्रुपमध्ये सक्रिय असल्याची माहिती तपासात समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. याच अनुषंगाने त्यांची चौकशी केली जात असल्याचे समजते.
यापूर्वी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही एटीएसने श्रीरामपुरात येऊन काही युवकांची चौकशी केली होती. त्यावेळी सात ते आठ जण तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याचे समोर आले होते. त्यापैकी काहींची चौकशी झाली होती, तर उर्वरितांचा शोध सुरू होता. त्याच तपासाचा पुढचा टप्पा म्हणून ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.
संपूर्ण दिवस एटीएसच्या पथकाकडून संबंधित युवकांची चौकशी सुरू होती. त्यांच्या डिजिटल उपकरणांतील माहिती, सोशल मीडिया व्यवहार आणि संपर्कांची पडताळणी करण्यात येत असल्याचे समजते. या कारवाईमुळे श्रीरामपुरात दिवसभर चर्चेला उधाण आले होते.
दरम्यान, एटीएसकडून या कारवाईबाबत कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच पुढील भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
कोण आहे शहजाद भट्टी?
शहजाद भट्टी हा पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर असून तो दुबईतून आपले गुन्हेगारी जाळे चालवत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अवैध शस्त्रास्त्र तस्करीशी त्याचे नाव जोडले गेले असून भारतातील काही गाजलेल्या गुन्ह्यांच्या तपासातही त्याचे नाव समोर आले आहे.



