राहुरी (प्रतिनिधि) :-मागील तीन वर्षांत विकासाचे कुठलेही काम विरोधकांकडून झाले नाही शिवाय एक रूपयाचा निधी देखील त्यांना आणता आला नाही त्यामुळे काहीतरी काढून विरोध करण्याचे काम हे सध्या सुरू असल्याचे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी सांगून तीन वर्षांत कांद्यासह इतर शेत मालाला किती भाव दिला हे जाहिर सांगण्याचे त्यांनी विरोधकांना आवाहन दिले.
ते राहुरी तालुक्यातील मौजे बाभूळगाव येथे 43.66 कोटी रूपयांच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा व विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, जेष्ठ नेते अॅड सुभाष पाटिल यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना खा.विखे म्हणाले की न भूतो न भविष्यती असे काम मागील चार महिन्यांत आपण करून दाखवले आहे, हे केलेले काम आता सर्वसामान्य जनतेतून दिसत असून जनतेला सरकार बद्दल विश्वास वाटत आहे, आणि नेमकी हीच बाब विरोधकांची पोटदुखी ठरत आहे. तीन वर्षांत विरोधकांनी आपल्या जिल्ह्याचा विकास खुंटवला ,एक दमडी देखील जिल्ह्य़ात आणली नाही आणि दूसरीकडे केवळ चार महिन्यांत जल जीवन मिशन योजनेअंतर्गत दोन हजार कोटी रूपया पेक्षा जास्तीचा निधी आपण आणला तसेच जिल्हा नियोजन समितीतून शेकडो कोटी रूपयांची कामे आपण मंजूर करून त्याचे शुभारंभ देखील करत आहोत. आता आपले डबल इंजिनचे सरकार आहे असे त्यांनी सांगताना मागील तीन वर्षांत शेतकरयांचा कळवळा विरोधकांना का आला नाही, शिंदे-फडणवीसचे सरकार आले की लगेचच शेतकरयावर अन्याय झालेला का दिसतो असा सवाल उपस्थित केला.
नगर जिल्ह्य़ातील गावांतर्गत रस्ते तसेच पडून होते मात्र या रस्त्यांसाठी तीन वर्षांत एक रूपया निधी आणला नाही मात्र केंद्र आणि राज्य सरकार ह्या दोन्हीच्या माध्यमातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जिल्ह्य़ातील सर्व रस्त्यांच्या दूरूस्ती तसेच डांबरीकरणासाठी मोठ्याप्रमाणात आपणांस निधी मिळाला असल्याचे खा.डाॅ.सुजय विखे यांनी सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 2019 च्या निवडणुकीत आपल्या सर्वांना घरोघरी पिण्याचे स्वच्छ पाणी तेही नळाद्वारे याचा शब्द दिला होता, त्याचीच पूर्तता आपण पुढिल सहा महिन्यात करत आहोत. हे आपले सरकार आहे त्यामुळे आपल्या सर्व समस्यां सोडविण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. पुढिल काळात देखील आपला भाग सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपण आमच्या पाठीशी खंबीरपणांनी उभे रहा, आम्ही आपला विश्वास सार्थ ठरवू असे शेवटी सांगितले.
माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, अॅड.सुभाष पाटील यांची समयोचित भाषणे झाली.
या कार्यक्रमात बाभुळगाव (43.66), वाघाचा आखाडा (1.74),तांदूळवाडी(1.99), कोंढवड(72.32)कोटी शिलेगाव (80 लक्ष) रूपयांच्या विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला.
या शुभारंभ कार्यक्रमात पंचक्रोशीतील नागरिक, पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.