राहाता(जनता आवाज वृत्तसेवा):–महसूल हा थेट सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित विभाग आहे. महसुली अधिकारी – कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशीलतेने काम करत जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
राहाता येथे महसूल विभागातर्फे आयोजित ‘महसूल सप्ताह – २०२५’ या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास माजी मंत्री तथा अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरिष वमने, तहसीलदार अमोल मोरे, राहाता नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव लोंढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले , “महसूल मंत्री असताना महसूल पंधरवड्याची संकल्पना प्रथम राबवण्यात आली होती. त्याअंतर्गत ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ सारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे सैनिकांचे प्रश्न सोडविण्यात आले. खंडकऱ्यांच्या जमिनीचे प्रश्न मार्गी लागले. शेती महामंडळाच्या जमिनी विविध शासकीय उपक्रमांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. गायरान जमिनींचा वापर घरकुलांसाठी करण्यात आला. तसेच भोगवटा २ मधील नोंदी भोगवटा १ मध्ये करण्यात आल्या. महसूल सेवा अधिक सुलभ व पारदर्शक करण्यासाठी त्या ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करण्यात आल्या.”
“नैसर्गिक आपत्तीच्या काळात महसूल कर्मचारीच नागरिकांना सर्वप्रथम मदत करण्यासाठी धाव घेतो. त्यामुळे या विभागाचे कार्य अधिक महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्यांकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच ओढे-नाल्यावरील अतिक्रमणे स्वतःहून दूर करावीत.”असेही त्यांनी सांगितले.
“जायकवाडी धरण पन्नास वर्षांत प्रथमच पूर्ण क्षमतेने भरले असून गोदावरी नदीतून पाणी सोडण्यात आले आहे. निळवंडे धरणातून कालव्यांमध्ये मुबलक पाणी सोडले गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा पाण्याची कमतरता भासणार नाही. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मुळा व भंडारदरा धरणांमध्ये प्रत्येकी १० टीएमसी पाणी आणण्यात येणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळमुक्त करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे.”, असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.
माजी मंत्री श्री. म्हस्के पाटील म्हणाले, “महसूल विभाग हा शासनाचा आरसा आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम महसूल अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे करावे. खंडकऱ्यांचे अनेक प्रश्न महसूल विभागाच्या माध्यमातून सुटले असून योजनांच्या अंमलबजावणीत नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे.”
अपर जिल्हाधिकारी श्री. कोळेकर म्हणाले, महसूल सप्ताहात मोहीम स्वरूपात उपक्रम राबविण्यात येणार असून महसूल सेवा नागरिकांना विनासायास उपलब्ध करून दिल्या जातील. अनेक सेवा आता एका क्लिकवर ऑनलाईन मिळत असून त्यात आणखी सेवांचा समावेश करण्यात येत आहे. विशेष सहाय्य योजनांचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांची घरी जाऊन केवायसी (KYC) प्रक्रिया राबवली जात आहे. सर्व नागरिकांनी शासन उपक्रमात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात जात प्रमाणपत्र, सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे लाभ, जीवंत सातबारा मोहीम, शर्तभंग जमीन नियमाकुल करणे, स्वामित्व योजनेंतर्गत सनद, एग्रीस्टॅक योजनेतील शेतकऱ्यांना ओळखपत्र व भोगवटा २ चे भोगवटा १ मध्ये रूपांतर करण्याचे आदेश पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
तसेच, अस्तगाव, चोळकेवाडी, पडसवाळ या तीन किलोमीटर शिव रस्त्याच्या मोजणी नकाशाचे वाटप करण्यात आले. संगमनेर तालुक्यातील जांभुळवाडी या नव्याने घोषित महसूली गावाच्या अधिसूचनेचे वाटपही यावेळी ग्रामस्थांना करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी १ ते ७ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या महसूल सप्ताहातील उपक्रमांची व नागरिकांना पुरविण्यात आलेल्या महसूल सेवांच्या फलनिष्पत्तीची माहिती दिली.