पारनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- शेतकऱ्यांची कर्ज माफी , कांदा भाव वाढ , कांदा निर्यातबंदी मागे घ्यावी , या आणि इतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी गेल्या सलग ४ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले युवा शेतकरी नेते व आपली माती , आपली माणसं या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष रूपेश ढवण यांनी उभारलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निघोज येथे उद्या दि .२४ रोजी संपूर्ण गाव बंद राहणार असून सकाळी १० वाजता बसस्थानक परिसरात मुख्य रस्त्यावर वारकरी , शेतकरी , व्यापारी , ग्रामस्थ यांच्यावतीने भव्य रस्ता रोको आयोजित करण्यात आले आहे .
युवा शेतकरी नेता रुपेश ढवण यांनी नुकतेच २० दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या च प्रश्नांवर ४ दिवस अन्न त्याग आंदोलन केले होते , त्यावेळी त्यांना राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळाला होता , त्यांनी मांडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाला २० दिवसांची मुदत दिली होती व हे प्रश्न मार्गी न लागल्यास पुन्हा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा ही दिला होता , त्यासंदर्भात त्यांना राजकीय नेत्यांनी शब्द ही दिला , पण या २० दिवसांमध्ये शेतकऱ्यांचे एक ही प्रश्न मार्गी लागला नाही , त्या निषेधार्थ रुपेश ढवण यांनी गुरुवार दि . २० रोजी ग्रामदैवत श्री मळगंगा देवीचे दर्शन घेत आमरण उपोषणाला सुरुवात केली , आज शनिवारी या उपोषणाचा ४ था दिवस असून या कालावधीत पोलीस प्रशासन वगळता , पारनेर तालुका वा नगर जिल्हा पातळीवरील एका ही शासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही , वा साधी विचारपूस ही केली नाही . निघोज ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी उपोषणकर्ते रुपेश ढवण यांची आरोग्य तपासणी केली असता , त्यांचा बी पी वाढला , तर वजन घटले असून थकवा जाणवू लागला आहे . त्यांच्या आरोग्यावर परिणाम जाणवू लागला आहे .
राज्यात सत्तेवर असलेल्या सध्याच्या महायुती शासनाने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची कर्ज माफी , कांदा भाव वाढ , कांदा निर्यात खुली करणार , शेती मालाला हमी भाव , या व इतर प्रश्न सोडवण्याचा दिलेला शब्द , सत्तेवर येताच दुर्लक्ष केले . त्यात निसर्गाने गरज नसताना उन्हाळ्यात भरपूर पाऊस दिला . आता पिकांना पावसाची गरज असतानाही पाऊस नाही , पिके सुकून गेली , अक्षरशः पिके करपली आहेत . त्यात कांद्याला भाव नाही , परिणामी बाजारपेठेवर त्याचा फार मोठा परिणाम झाल्याने व्यवसाय ठप्प झाले आहेत , त्यांचा लहान मोठ्या व्यापारी वर्गाला मोठा फटका बसला आहे . आर्थिक उलाढाल मंदावली आहे . याला कारणीभूत शासनाचे चुकीचे धोरण ठरले आहे. .
यामुळे निघोज सारख्या ग्रामीण भागातून रुपेश ढवण सारख्या शेतकरी पुत्राने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आदर्श घेत , अहिंसात्मक मार्गाने आमरण उपोषणाचे हत्यार उपसत हे जनआंदोलन उभे केले आहे . या आंदोलनाच्या उद्या च्या ५ व्या दिवशी पाठिंबा देण्यासाठी जनतेतून उत्सफुर्त प्रतिक्रिया उमटत उद्या रविवार दि . २४ रोजी पारनेर तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेले निघोज गाव बंद ठेवत , बस स्थानक परिसरातील मुख्य रस्त्यावर भव्य रस्ता रोको करण्यात येणार आहे .