कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा):- संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ योजनेअंतर्गत तब्बल ५४२ प्रकरणे पात्र-अपात्र निवडीसाठी तहसील कार्यालयात प्रलंबित असून या प्रकरणांची पात्रता व अपात्रता तपासण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. केवळ मीटिंग होत नाही म्हणून हे प्रकरणे प्रलंबित आहे.संबंधित लाभार्थ्यांना निर्णयाची प्रतीक्षा लागली असून ही प्रकरणे तातडीने मार्गी लावावीत, अशी सूचना आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी तहसील प्रशासनाकडे केली आहे.
आमदार विवेक कोल्हे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, तालुक्यात संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे एकूण ११ हजार ९९५ लाभार्थी आहेत. मात्र सध्या तहसील कार्यालयात या योजनांशी संबंधित अडचणी सोडविण्यासाठी वेळेवर बैठका होत नसल्याने तब्बल ५४२ प्रस्ताव प्रलंबित राहिले आहेत त्या नागरिकांचे आर्थिक नुकसान या हलगर्जीपणामुळे होते आहे.
कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात लाभार्थी या योजनांचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालयात येत असतात. मात्र त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषतः वयोवृद्ध, महिला व निराधार लाभार्थ्यांना वारंवार तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत. गोरगरीबांच्या प्रस्तावांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना लाभार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे.ज्यांच्याकडे जबाबदारी होती त्या लोकप्रतिनिधीनी ती वेळेत पार पाडणे अपेक्षित होते मात्र तसे न झाल्यामुळे कित्येक काळ नागरिक या बैठकीच्या प्रतीक्षेत होते.
काही वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याची तक्रार असून कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी किचकट अटी लादल्या जात असल्याने सर्वसामान्य लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. लाभार्थी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही संबंधित प्रस्तावांवर बैठका होत नसल्याने आणि याद्या जाहीर न केल्याने लाभार्थ्यांमध्ये स्थानिक पातळीवर झालेल्या दुर्लक्षामुळे नाराजीचे वातावरण निर्माण झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याशिवाय, कोपरगाव पंचायत समितीमार्फत छत्रपती राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलावंत योजनेअंतर्गत ४४ प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा व तालुका स्तरावरून मोठ्या प्रमाणात वृद्ध कलावंतांचे प्रस्ताव पाठविले जात असतानाही त्यांना वेळेत मंजुरी मिळत नसल्याने संबंधित अडचणींकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी आमदार विवेक कोल्हे यांनी केली आहे.



