श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- बिलाच्या वादावरून हॉटेल व्यावसायिकावर काचेचा टीपॉय डोक्यात घालून त्याची हत्या केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील नेवासा रोडवरील हॉटेल लक्ष्मीनारायण येथे घडली आहे.
या हल्ल्यात हॉटेल व्यवसायिक आकाश शेखर दुबय्या यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याचा चुलत भाऊ कुणाल कैलास दुबय्या जखमी झालेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुरेश सतीश जाधव (रा. खिलारी वस्ती) यास पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा रोडवरील हॉटेल लक्ष्मी नारायण येथे काहीजण जेवणासाठी आलेले होते. जेवण झाल्यानंतर बिलावरून त्यांची हुज्जत घालण्यास सुरूवात केली. यावेळी हॉटेल चालक या ठिकाणी आले व त्यांनी बिल पूर्ण देण्यास सांगितले. यावरून परत त्यांच्यात वाद सुरू झाला. जेवणापैकी आलेल्या एकाने आकाश यांच्या डोक्यात कोयता घातला. याचवेळी भावाच्या मदतीस आलेल्या कुणाल दुबय्या याच्यावही आरोपींनी हल्ला चढविला. त्याच्यावरही कोयत्याने वार करण्यात आले. सध्या त्यांच्यावर कामगार रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या झटापटीत सुरेश जाधव हा देखील जखमी झालेला आहे. त्याच्यावरही साखर कामगार रूग्णालयात उपचार सुरू आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न
श्रीरामपूर आणि अहिल्यानगर (अहमदनगर) परिसरात गेल्या काही महिन्यांत किरकोळ वाद आणि वैयक्तिक वैमनस्यातून गंभीर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा घटनांमुळे स्थानिक व्यापारी, व्यावसायिक आणि उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, गुन्हेगारांवर कठोर वचक निर्माण करावा आणि पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.



