श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):– मागच्यावेळी शिर्डी लोकसभा निवडणूकीदरम्यान आपल्या विरोधात चुकीचा प्रचार झाला.कुणा एका व्यक्तीमुळे माझा पराभव या ठिकाणी झाला नसून शिर्डी लोकसभा मतदारसंघातुन पुन्हा निवडणूक लढवण्याची माझी इच्छा असल्याचे केंद्रीय मंत्री रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास अठवले यांनी म्हटले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे तरुणांना झालेल्या मारहाणी प्रकरणी पीडितांची चौकशी करण्यासाठी ना. रामदास अठवले हे हरेगाव येथे आले होते. त्यानंतर येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ना.आठवले बोलत होते.यावेळी रिपाइंचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ना. आठवले पुढे म्हणाले की,माझी राज्यसभेची टर्म 2026 पर्यंत असली तरी शिर्डी लोकसभा निवडणुक लढवून येथील भागासाठी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा उपयोग करण्याचा माझा मानस आहे. मी कधीही अट्रोसिटी कायद्याचा गैरवापर होऊ दिलेला नाही.परंतु मागच्या निवडणूकीच्या वेळी आपल्या विरोधात चुकीचा प्रचार झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी-आरपीआय अशी मजबूत युती असताना देखील माझा पराभव या ठिकाणी झाला.आता राज्यात महायुतीचे सरकार असून देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्कम नेतृत्व लाभले आहे.त्यामुळे शिर्डीतुन आपल्याला पुन्हा संधी मिळावी अशी आपली मागणी त्यांच्याकडे केलेली आहे.राज्यात सरकार शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवित आहे.या कार्यक्रमात तिन्ही पक्षांचे झेंडे लावले जातात. त्या ठिकाणी आरपीआय पक्षाचा झेंडा देखील लावला जावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहोत.राज्यात आरपीआय शिवाय सत्ता मिळवणे शक्य नाही.त्यामुळे ते यावर योग्य ती निर्णय घेतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरविण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येवून ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली आहे. त्यांना पंतप्रधान पदाच उमेदवार देणे अद्यापही शक्य झालेले नाही. पंतप्रधान मोदी यांना हरविणे इंडिया आघाडीला शक्य नाही. मागासवर्गिय महामंडळाचे सहाशे कोटीचे कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्रिमंडळाचे पाच दिवसांचे अधिवेशन बोलविण्यात आले असून यामध्ये ‘वन नेशन नव इलेक्शन’ हे बील पास होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.



