मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):- महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाने हादरले आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील उभी फूट पडली आहे. आज रविवारी (दि.2) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता हे फक्त शिंदे-फडणवीस सरकार राहिले नसून शिंदे-फडणवीस-अजित पवार यांचे सरकार झाले आहे. अजित पवार यांच्यासह छगन भूजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, धर्मराव आत्राम, संजय बनसोडे, आणि अनिल भाईदास पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली.
अजित पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षातील अजित पवार यांची नाराजी स्पष्ट दिसून येत होती. त्यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदातून मुक्त करावे आणि दुसरी जबाबदारी द्यावी, असे म्हटले होते. त्यांनी 1 जुलैपर्यंतचा अल्टिमेटमही दिला होता. मात्र, यावर निर्णय न झाल्याने आज अजित पवार यांनी देवगिरी येथे बैठक बोलावली आणि राज्याच्या राजकारणाने पुन्हा एकदा मोठा टर्निंग पॉइंट घेतला. आज रविवारी दुपारनंतर मोठ्या वेगाने घडामोडी घडत गेल्या. आता पुढे राजकारणात काय घडेल अशी चर्चा जनसमनात आहे.




