राहाता, दि.११( जनता आवाज
वृत्तसेवा ):-गोदावरी लाभक्षेत्रात उन्हाळी हंगामाकरीता १२ जून पासून आवर्तन सुरु करण्याच्या सुचना महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागास दिल्या आहेत. आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गोदावरी धरण समुहातील असलेल्या पाणी साठ्याचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी आधिका-यांकडून घेतला. सद्य परिस्थितीत उन्हाची तिव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई काही गावांमध्ये निर्माण झाली आहेत. तसेच शेतीसाठीही पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात आवश्यक असल्याने पाण्याचे आवर्तन सोडावे अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतक-यांना ना.विखे पाटील यांची भेट घेवून केली होती.
जलसंपदा विभागांच्या आधिका-यांशी झालेल्या चर्चेनंतर सोमवार दिनांक १२ जून पासून तातडीने हे आवर्तन सोडण्याच्या सुचना मंत्री विखे पाटील दिल्या. या आवर्तनामुळे लाभक्षेत्राला मोठा दिलासा मिळणार असून, पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता आधिका-यांनी घ्यावी असेही मंत्री विखे पाटील यांनी सुचित केले आहे.



