पारनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहिती अधिकार कायद्यात (आरटीआय) काही नियमांत बदल केल्याने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. हे बदललेले नियम मागे न घेतल्यास त्यांनी उपोषण करण्याचा इशार दिला आहे.
दरम्यान, अण्णा हजारे यांनी उपोषणाला बसू नये यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. बदललेले नियम आणि अण्णा हजारे यांची भूमिका यात काही तोडगा काढता येतो का? यासाठी प्रयत्न केला जात आहे. परंतु यात अजूनही कोणताच तोडगा निघालेला नाही. असे असतानाच राज्य सरकारतर्फे मुख्य माहिती आयुक्त आणि अण्णा हजारे यांच्यात नव्याने बैठक झाली आहे. परंतु ही बैठक निष्फळ ठरली आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राळेगणसिद्धीमध्ये अण्णा हजारे व मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्यात आज (24 जून) बैठक झाली. पण ही बैठक मात्र निष्फळ ठरली आहे. माहिती अधिकार नियमांतील बदलांवरून अण्णा हजारे आक्रमक झाले आहेत. समाधानकारक तोडगा न निघाल्यास येत्या ५ जुलैपासून उपोषण करण्याचा अण्णा हजारे यांचा इशारा कायम आहे. माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज करावयाचा असेल तर शुल्कवाढ, ओळखपत्र सक्ती व “एक विषय-एक अर्ज” या नियमांना अण्णा हजारे यांनी विरोध केला आहे.
आता यावर तोडगा काढण्यासाठी आणखी एक चर्चेची बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. राहुल पांडे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलनाबाबत निर्णय सरकार आणि अण्णा हजारे यांनी घ्यायचा आहे, असे ते म्हणाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अण्णा हजारे यांनी पत्र पाठवलेले आहे. लागू करण्यात आलेले नियम मागे घ्यावेत, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. आजची बैठकही निष्फळ ठरल्याने भविष्यात काय होणार? याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.



