उक्कलगाव ( जनता आवाज वृत्तसेवा):- श्री हरिहर केशव गोविंद भगवानाच्या मंदिर कळसाचे नूतनीकरण, मंदिर दुरुस्ती आणि इतर विकासकामांसाठी भाविकांच्या श्रद्धेचा व भावनांचा आदर करत दोन्ही विश्वस्त मंडळांनी सर्वभेद विसरून “देवासाठी एकत्र यावे,” अशी एकमुखी साद श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगावच्या ग्रामस्थांनी घातली आहेत.
गावातील मंदिरात ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सकाळी एक महत्त्वाची नियोजन बैठक पार पडली.
या बैठकीला अशोक सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक रावसाहेब हरी पाटील थोरात, माजी सभापती आबासाहेब थोरात, सरपंच रविना शिंदे, उपसरपंच नितीन थोरात, ग्रामपंचायत सदस्य ॲड. पुरुषोत्तम थोरात यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व तरुण मंडळे, उपस्थित होते.
या बैठकीत दरम्यान मंदिराच्या कारभारावरून आणि हिशोबावरून चांगलीच चर्चा रंगली.काही मुद्द्यांवरून उपस्थितांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या पंधरा दिवसापासून सोशल मिडियावरून गावाचे वातावरण तापले होते.
आमचा तंतोतत हिशोब आणि पूर्ण खर्चाचा ताळेबंद तयार असून, त्यात कोणतीही तफावत नाही. उत्पन्नाच्या नफ्यातून मंदिराच्या कळसाचे काम होत असेल तर, तेही आपण पूर्ण करू शकतो, आणि हीच मागील महिन्याभरापूर्वीपासून आमची इच्छा असल्याचे विश्वस्त रविंद्र जगधने यांनी स्पष्ट केले.
भाविकांच्या श्रद्धेचा विचार करूनच ही बैठक बोलवण्यात आली आहेत.मंदिरासाठी स्वतंत्र उत्पन्नाचा कोणताही मोठा स्रोत उपलब्ध नसून, मंदिराच्या आणि शेतातील नियोजित कामांसाठी उपलब्ध निधीतूनच खर्च केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच, आपल्या विश्वस्त मंडळाच्या काळातील आधीचा लेखाजोखा आपल्याकडे उपलब्ध नसल्याचेही विश्वस्त शरद दत्तात्रय थोरात यांनी स्पष्ट केले.
मागील सहा महिन्यापूर्वी केलेल्या नियोजनाचे काय झाले? त्यात नेमकी कोणी खोडा घातला? असा सवाल करत यावर उघडपणे बोलले पाहिजे, अशी आक्रमक भूमिका उपसरपंच नितीन थोरात यांनी मांडली.
मागील, बैठका कोणत्या कारणांमुळे रद्द झाल्या किंवा कोणाला काय अडचणी आल्या, याचा विचार करत बसण्यापेक्षा यापुढे मंदिराचे काम सुरळीत कसे पार पाडता येईल, हे एकमेव ध्येय डोळ्यांसमोर ठेवून कामाला सुरुवात करूया,असा विश्वास ग्रामपंचायत सदस्य ऍड.पुरुषोत्तम थोरात यांनी ग्रामस्थांना दिला असून, आमचा पुर्णपणे पाठिंबा असेल ते म्हणाले.
या, बैठकीत काही मुद्द्यांवर मतभेद दिसून आले असले, तरी देवाचे काम मार्गी लावण्यासाठी सर्वजण आग्रही आहेत.आता या विषयावर आगामी चौथ्या सोमवारी पुन्हा एकदा नियोजन बैठक पार पडणार असून, त्या बैठकीत काय ठोस निर्णय होतात? आणि दोन्ही विश्वस्त मंडळे एकत्र येतात का, याकडे संपूर्ण उक्कलगावच्या ग्रामस्थांच्या नजरा लागल्या आहेत.
यावेळी, रविंद्र थोरात,आदिनाथ जगधने,युवराज थोरात, सागर चव्हाण, अमित भगत, धनजंय थोरात, प्रकाश थोरात, अशोक शिंदे, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
चारच विश्वस्तांची उपस्थिती
एकूण १५ विश्वस्तांपैकी या महत्त्वपूर्ण बैठकीला फक्त चार विश्वस्त हजर होते. यामध्ये उल्हास महाराज तांबे, रविंद्र जगधने, शरद थोरात आणि जालिंदर थोरात यांचा समावेश होता.उर्वरित विश्वस्तांनी या बैठकीला पाठ फिरवल्याने अनुपस्थित राहिल्याबद्दल ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू होती.




Total Users : 624914