करंजी( जनता आवाज वृत्तसेवा ): — अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या तिसगाव येथे विद्यालयाच्या परिसरातील वृद्धेश्वर चौकामध्ये शाळा भरताना व शाळा सुटताना परिसरातील काही दुकानाजवळ टवाळखोर तरुण थांबून राहतात या टवाळखोर तरुणांकडून शालेय विद्यार्थिनींवर नजर ठेवून त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो.संस्थेची बातमी नको म्हणून शाळेकडून घडलेल्या प्रकारानंतर माफीनामा लिहून घेतला जातो व प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जातो.नेहमीच या शाळा परिसरामध्ये मुलींची छेड काढण्याचे प्रकार घडत असल्याने तालुका पोलीस प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्यावी व या शाळा परिसरातील चौकात थांबणाऱ्या टवाळखोर तरुणावर कठोर कारवाई करावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे तिसगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.
अनेक टवाळखोर गावातील अथवा बाहेरगावातील मुलींचा शाळा सुटल्यानंतर मोटरसायकलद्वारे पाठलाग करून त्यांची छेड काढण्याचा प्रयत्न करतात या प्रकारामुळे काही मुलींनी तिसगाव मधून इतर ठिकाणी शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे तर काही पालकांनी मुलींना शाळेत न पाठवण्याची देखील कठोर भूमिका घेतलेली आहे.छेडछाडीचे प्रकार शाळा परिसरात वाढल्याने पालकांनी देखील शाळेत जाऊन शाळा व्यवस्थापनाची चांगलीच कानउघडणी केली आहे.तिसगाव शाळेसमोर मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणामुळे शाळेत ये जा करताना या शालेय मुलींना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.या परिसरातील दुकानांमध्येच टवाळखोर तरूण दबा धरून बसलेले असतात एवढेच नव्हे तर मोटर सायकलच्या माध्यमातून बाहेर गावच्या मुलींचा पाठलाग करून कर्ककर्कश हॉर्नद्वारे या मुलींना मानसिक त्रास देण्याचा देखील प्रयत्न करतात.हा संपूर्ण प्रकार मुली निमुटपणे सहन करतात तसेच घरच्या कुटुंबांना त्रास दिला जात असल्याचा प्रकार समजला तर आपली शाळा बंद होईल या भीतीने या मुली या टवाळखोरांचा त्रास सहन करत आहेत.छेडछाडीचे प्रकार होऊ नयेत म्हणून शाळेकडून पालक शिक्षक मेळावा आयोजित करावा.
असले प्रकार पून्हा होणार नाहीत यासाठी पोलिसांची मदत मिळावी म्हणुन तिसगाव येथील शिवसेना उपशहर प्रमुख कल्याण लवांडे,शिरपूराचे सरपंच नितीन लोमटे,युवानेते अकील लवांडे,सुनील लवांडे,घाटशिरसचे पंढरीनाथ चोथे,राहुल कासार,अक्षय मरकड,अमोल रायकर,प्रसाद देशमुख,दादासाहेब पाठक,किरण गारुडकर,भूषण पवार,सचिन लवांडे,रवींद्र ससाने,सोमनाथ बोरुडे,सचिन जाधव,दिग्विजय देशमुख,संजय पाटील लवांडे,ताहेर सय्यद,आदित्य लवांडे,निलेश लवांडे, गणेश लवांडे यांनी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना लेखी निवेदन देऊन या मुलींच्या छेडछाडी प्रकरणाला आळा घालण्याची विनंती निवेदनाद्वारे केली आहे.




Total Users : 619814