आश्वी( जनता आवाज वृत्तसेवा):-शेजारचे नेते इकडे येवून फक्त व्यक्तिव्देशाची भाषण करीत आहेत. त्यांच्याकडे सांगायला काहीच नाही, हसण्या पलिकडे ते काहीच देवू शकत नाही, त्यांनीच त्यांच्या तालुक्याची हसून जिरविली आहे. इकडे येवून फक्त आता आपल्या प्रपंचाची होळी करण्याचे मनसुबे आता त्यांनी रचले आहेत. गावात येवून निंदा, नालस्तीची भाषण झालीच तर त्यांना जाब विचारा असे आवाहन महायुतीचे उमेदवार मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
शिर्डी विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ श्री.क्षेत्र निझर्णेश्वर येथे माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी जेष्ठनेते आबासाहेब खर्डे पाटील, जेष्ठनेते शाळीग्राम होडगर, सौ.शालिनीताई विखे पाटील, राजेंद्र विखे पाटील, भाजपाचे राजेंद्र गोंदकर, शिवसेनेचे कमलाकर काते, आरपीयचे सुरेंद्र थोरात, राष्ट्रवादीचे कपील पवार, कैलास कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, कैलास तांबे, डॉ.भास्करराव खर्डे, मच्छिंद्र थेटे आदि या प्रसंगी उपस्थित होते. हिंदु एकता आदर्श पक्षाचे उमेदवार सुदर्शन शितोळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेवून मंत्री विखे पाटील यांना आपला पाठींबा जाहीर केला.
मंत्री विखे पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, सलग सात वेळा आपण सर्वांनी मला या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. मतदार संघातील सर्वसामान्य माणसाच्या विकासालाच आपण प्राधान्य दिले. ज्या पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्या माध्यमातून या परिसराचा विकास करण्याचाच आपण प्रयत्न केला. महायुती सरकारच्या माध्यमातून अनेक योजना सुरु झाल्या. योजनांचे अनुदान शेतकरी, लाडकी बहीण यांच्या खात्यात मिळत आहे. अशा पध्दतीच्या योजना कधी पाहायलाही मिळत नव्हत्या. परंतू योजनांमुळे सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन होत असल्याचे समाधान आहे.
मतदार संघात आता विरोधक त्यांची भूमिका बजावत आहेत. पण त्यांच्याकडे सांगायला काही नाही. केवळ व्यक्तिव्देश आणि निंदा, नालस्ती आहे. विकासावर बोलायला ते तयार नाहीत. या मतदार संघासाठी ते काय करणार हे सांगायला ते तयार नाहीत. आता आपल्या तालुक्याचा विकास त्यांना देखवत नाही. म्हणूनच येथील प्रपंच उध्वस्त करण्यासाठी ते आता इकडे येत आहेत. पण त्यांच्या तालुक्याचे त्यांनी हसून किती वाटोळे केले हे एकदा जावून पाहा याकडे लक्ष वेधून मंत्री विखे पाटील म्हणले की, सात वर्षे महसूल मंत्रीपदावर होते परंतू एकही सामान्य माणसाच्या हिताचा आणि सार्वजनिक विकासाचा निर्णय ते करु शकले नाहीत.
राज्यात गायरान जमीनीचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा न्यायालयात योग्य भूमिका मांडून सामान्य माणसाला दिलासा दिला. खंडकरी शेतक-यांच्या बाबतीत सुध्दा धाडस दाखवून निर्णय झाल्यामुळेच शेतक-यांच्या जमीनी भोगवटा वर्ग एक झाल्या. दूधाचे अनुदान, पीक विमा योजनेचे अनुदान, वीज बिल माफ होण्यासाठी महायुती सरकारने निर्णय घेतले. पुढच्या सहा महिन्यात आता सौर उर्जेच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करुन, शेतक-यांना दिवसा वीज देण्याची भूमिका महायुती सरकार करेल अशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.
मतदार संघामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत साडेचारशे कोटी रुपयांचे कामे सुरु आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ४७ कोटी रुपयांच्या योजना मंजुर झाल्या आहेत. गुंठेवारीचा निर्णय झाल्यामुळे अवघी पाच टक्के रक्कम भरुन व्यवहार नियमित करण्याबाबतचा निर्णय घेतला गेला. हे सर्व निर्णय करीत असताना तुम्हाला दशहत वाटते का असा प्रश्न उपस्थित करून, आमची दशहत ही माफीयांविरोधात सामान्य माणसांची लुट करणा-यांच्या विरोधात निश्चित आहे. पण आता या दशहतीचे झाकण तुमच्याच तालुक्यात असे उडते ते पहा असा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.
शिवसेनेचे कमलाकर कोते यांनी आपल्या भाषणात साईबाबांची शिर्डी आणि विखे पाटलांचा मतदार संघ हीच ओळख संपूर्ण राज्यात आहे. त्यांच्याकडे विकासाचे झाकण आहे. कोणतीही दहशत नाही. ज्या ज्या वेळी कार्यकर्ता अडचणीत येतो त्यावेळी विखे पाटील ठामपणे उभे राहत असल्याचे त्यांनी सांगितले. आरपीआयचे सुरेंद्र थोरात यांनी शिर्डी मतदार संघ हा एकमेव असा मतदार संघ आहे की, जिथे जातीचा आणि धर्माचा संघर्ष नाही. सर्वांना बरोबर घेवून काम करणारे नेते म्हणून ना.विखे पाटलांची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.
जेष्ठनेते शाळीग्राम होडगर म्हणाले की, विखे पाटलांकडे असणारा लोकसंग्रह ही त्यांच्या कामाची पावती आहे. लोकांची होणारी गर्दी त्यांचे नेतृत्व सिध्द करते. समोरचा उमेदवार कोण आहे याचा विचार करण्यापेक्षा पाच वर्षे ना.विखे पाटील आपल्यासाठी काम करतात आपण फक्त त्यांच्यासाठी १५ काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी राजेंद्र गोंदकर, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, इलियाज शेख, बाळासाहेब गाडेकर, संतोष गोर्डे यांचीही भाषण झाली. सभेचे प्रास्ताविक कैलास कोते यांनी केले.
नगर दक्षिणेतील पराभव हा आपल्या सर्वांच्याच जिव्हारी लागलेला होता. विजय होण्यासाठी येथे बसलेल्या प्रत्येकाने कष्ट घेतले होते. पण आपघाताने झालेल्या या पराभवामुळे स्वर्ग दोन बोटे राहीला. पराभवासाठी अनेकांनी दुनियादारी केली. हजारो कामगार पाठविले. पण आता या पराभवाचा वचपा काढण्यासाठी महायुतीला चांगले मताधिक्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.



